“काटा रुते कुणाला ते साथ दे तू मला ” अश्या बहुपैलू मालिकांमध्ये आपल्या कामाची किमया दाखवणारा अभिनेता!
हिंदी, बंगाली अश्या बहुभाषिक नाटकांतून रंगभूमी गाजवणारा, मराठी इंडस्ट्रीत अगदी रोक ठोक मत मांडून नेहमी व्यक्त होत राहणारा अभिनेता पियुष रानडे..
आजच्या प्लॅनेट मराठी च्या स्टार ऑफ द वीक मध्ये पियूष सोबत काही खास गप्पा आम्ही घेऊन आलो आहोत….
संपूर्ण नाव : पियुष विभास रानडे.
वाढदिवस : २८ मार्च १९८३
जन्मठिकाण : नागपूर
शिक्षण : बडोदा
(बी. कॉम, बॅचलर इन परफॉर्मिंग आर्टस्)
“ती साडेतीन वर्ष मोलाची”
अभिनेता म्हणून प्रसिद्धीस येण्याच्या आधीचा प्रवास माझ्यासाठी फार खास आणि अविस्मरणीय आहे. ३ वर्ष बडोद्यात नाटक केलं जेंव्हा मुंबईत यायचंय असं ठरवलं त्या आधी मी “सीए” (Chartered Accountant) करणार होतो पण सीए व्हायचं हे ठरवण्याच्या आधी मी एक खेळाडू होतो. मी राष्ट्रीय स्तरावर व्हाॅलीबाॅल खेळायचो. तेंव्हा असं ठरवलं कि खेळात आपण काही तरी करिअर घडवू या. पण या सगळ्यात माझं कोरिया मध्ये खेळाण्यासाठी माझी निवड झाली पण माझी १२ विच्या बोर्डाची परीक्षा होती. तेंव्हा आलेली संधी मी थांबवली पण कुठेतरी करियर आणि शिक्षण पूर्ण करायचं होत हे डोक्यात असल्यामुळे हि संधी हातातून गेली आणि नंतर अशी संधी आलीच नाही. १२ वि नंतर मी कॉमर्स कडे वळलो. अनेकांनी सांगितलं कि मॉडेलिंग चालू कर पण कुठेतरी एक गोष्ट मनात आली कि आपण पटकन एखाद्या गोष्टीत रमणारे नाही आहोत. एका ठिकाणी मला राहायला कधीच नाही आवडत. आयुष्यात नेहमी साहसी गोष्टी करण्याची हौस होती. नव्या अनुभवाची जोड आपल्या आयुष्यात हवी असल्यास कधीच एका ठिकाणी जास्त वेळ अडकून पडायला नको असं मला वाटत. मग मी खूप भटकत राहिलो. भटकत असताना मग मी ठरवलं चला मॉडेलिंग करू या. या गोष्टीचा फायदा असा झाला कि घरून पैसे घेणं बंद केलं. रॅम्प मॉडेलिंग, ऍड फिल्म्स मधून येणाऱ्या पैशातून मी माझे व्यवहार करू लागलो. मग या गोष्टी फार गांभीर्याने करू लागलो. तेंव्हा Grasson Mister India होत त्यासाठी मी फॉर्म भरला पण मग मला असं वाटलं कि माझी तयारी झाली नव्हती, तर मग ते काही मी केलं नाही. तेंव्हा माझ्या बाबांनी जे आता [हेडऑफ डिपार्टमेंट वाद्य विभाग MS विद्यापीठ बडोदा मध्ये ] तर ते व्हॉयलीन वादक आहेत. माझ्या घरात संगीताचं वातावरण आहे. माझे आजोबा गॉलियर घराण्याचे व्हॉयलीन वादक होते. आजोबा सोबत बाबा सुद्धा त्या घराण्यात व्हॉयलीन वाजवायचे. माझ्या घरात कुठेतरी या कला रुजत होत्या त्यामुळे त्या आपसूक माझ्यात आल्या. मी ज्या कॉलेज मधून नाटक शिकलो त्या कॉलेजचे माझे आजोबा एक्स डीन होते. माझं बीकॉम झाल्यानंतर आपण जॉब करायचा हे ठरलं होत तर बाबांनी सहज मला एकदा कॉलेजला बोलवलं तिथे एक नाटकाची तालीम चालू होती तर तिथं काय सुरु आहे हेच माझ्या लक्षात येत नव्हतं. कोणी तरी रंगमंचावर उभं आहे तर काही समजत नव्हतं. मी बाहेर आलो तर त्या नाटकाचा दिग्दर्शक त्या कॉलेज चा विद्यार्थी होता. वडील कॉलेज मध्ये असल्या कारणाने एक वट होती. घरी गेल्यावर बाबांनी विचारलं कि काय ठरवलं? तर माझ्या बाबांची आणि मला ज्या महेश सरांनी मला अभिनयाचे धडे दिले त्यांची हि शक्कल होती मला नाटक आणि रंगभूमीवर काम करण्यासाठी तयार करण्याची. माझे स्वतःचे प्लॅन्स फार सेट होते पण आईने विचारलं कि तुला खरंच असं बोरिंग आयुष्य जगायचं का? तू एवढा कल्पक आहेस तर तुला वाटतं तू नोकरी करणार आहेस? पण माझे आई बाबा आणि घरच्यांनी फार पाठींबा दिला. आई ने फार प्रयोगशीलतेने जगण्याचा एक विचार माझ्या पुढे मांडला. मग विचार करायला लागलो मग म्हंटल करून बघू या. मग बाबांना संगितलं कि आपण फॉर्म भरायला जाऊयात. सुरुवात झाली मग ३ वर्ष इथे रुळलो कि माझा असंख्य वेळ कॉलेज, नाटक यातच जाऊ लागला. सेटवर झाडू मारण्यापासून ते अगदी सेट लावणं, लाईट्स, मेकअप, वेशभूषा, नाटकात काम केलं. दिग्दर्शन केलं हे सगळं मी रंगभूमी मुळे शिकलो आणि तरीही मला माहित नव्हतं कि आपण यातच करिअर घडवणार आहोत. छान वातावरणात रमलो आणि शिकत गेलो. माझे निकाल यातून चांगले यायला लागले. लोकांना काम आवडू लागलं मग चांगली नाटक करण्याची संधी मिळत गेली. हिंदी, इंग्रजी, बंगाली अश्या बहुभाषात काम केलं . मग दुसऱ्या वर्षात आल्यावर आपण इथेच करियर घडवून इथे काम करायचं हे पक्क झालं. माझ्या बॅचलर च्या ३ ऱ्या वर्षी मला अभिनयात गोल्ड मेडल मिळालं. लता मंगेशकर यांच्या कडून पदवी प्रदान सोहळ्याच्या वेळी मला त्याच्या हातून सन्मानित करण्यात आलं. १ वर्ष बडोद्यात राहिलो नाटकातून काम करत होत त्यानंतर मुंबई गाठली आणि खरंतर इथून खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. मुंबईत आल्यावर मला काहीच काम नव्हतं. राहायचं कुठे, काय करायचं हा शोध सुरु असताना कांदिवलीच्या मिलिटरी कॉलनी मध्ये राहायला लागलो. छोट्या जागेत ६ जण राहायचो त्यात घरचं भाड. एका क्षणाला आपण किती पैसे आई बाबांकडून घेणार म्हणून काम शोधायला लागलो. मुंबई सारख्या शहरात पारखण्याची खरी सुरुवात झाली. अनेक सवयी इथे येऊन बदलल्या. मी अनेकदा घरची किल्ली विसरलो कि कांदिवली किंवा बोरिवली स्टेशन वर झोपायचो. तेंव्हा सकाळी बाहेर पडून एवढं ट्रेन मधून अंधेरीत जाई पर्यंत भयानक भिजलेला असायचो. अश्या कपड्यात ऑडिशन ला कसं जाणार म्हणून इन्फिनिटी मॉल असो किंवा एखाद कॉफी शॉप जिथे एसी असेल तिथे जाऊन कपडे सुकवून मग ऑडिशन ला जायचो. घरी आल्यावर जेवण म्हणून पार्ले जी च बिस्कीट आणि चहा हे जेवण, थोडं बजेट वाढलं तर वडापाव आणि आमची पार्टी म्हणजे खिचडी. हा सगळा प्रवास किमान साडेतीन वर्ष चालला पण याच अनुभवातून या प्रवासातून शिकत गेलो. मुंबई हे एकमेव शहर आहे कि ज्यात जान आहे. या साडेतीन वर्षात एका क्षणाला पैसे कुठून कमवायचे म्हणून रघुलीला मॉल मध्ये मी जॉब केला. हा जॉब होता इंटरव्हल मध्ये पॉपकॉर्न विकण्याचा हे काम सुद्धा केलं. जी लोकं माझ्या सोबत या प्रवासात होती त्या सगळ्यांचे मी फार आभार मानतो. आम्ही ६ जण अजून सुद्धा संपर्कात आहोत. माझी फार कमी हक्काची लोकं आहेत.
“अधुरी एक कहाणी” या मालिकेत एक छोटासा रोल केला होता. महेश तागडे यांनी दिग्दर्शन केलेली हि मालिका. तेंव्हा वैभव चिंचाळकर आणि कार्तिक केंढे हे दोघे त्यांचे असिस्टंट होते. त्यांच्या प्रोडक्शन ला माझं काम आवडलं आणि त्यांनी मग मला “काटा रुते कुणाला” या मालिकेसाठी विचारलं आणि मला यात मुख्य भूमिका मिळाली. या बाबतीत घरी काही सांगितलं नव्हतं. जेंव्हा पहिल्या महिन्याचा चेक हाती आला तेव्हा मी घरी गेलो आणि आई बाबांना खुश खबर दिली. त्या दोघांना याचा फार आनंद झाला मग असा प्रवास सुरु झाला. नंतर कार्तिक केंढें सोबत “लज्जा” मालिका केली. आपण स्वतः किती खमके झालो आहोत याची जाणीव मला त्या साडेतीन वर्षात झाली.
“मराठीत कन्टेन्ट ची श्रीमंती पण व्यावसायिकतेच काय??”
मराठी मध्ये कला आहे, कन्टेन्ट आहे, आणि इथली माणसं खरी आहेत मग ते अगदी कलाकारांपासून ते दिग्दर्शक यांच्या पर्यंत प्रत्येक जण खरा आहे. उत्तम काम करणारी लोकं इथे आहेत. हिंदीत तेवढ्या तोडीस तोड काम करणारी लोक नाही आहेत. मराठी मध्ये व्यावसायिकता नाही आहे जी हिंदीत आहे. मराठी मधली लोक हा व्यावसाईक पणा जपत नाहीत मग तो कॉऑर्डिनेशन च्या बाबतीत असो किंवा लोकांना कामाच्या वेळा कळवण्याच्या बाबतीत. आपल्याकडे कलाकरांना सर्रास पणे गृहीत धरलं जातं जे नको व्हायला. आपली इंडस्ट्री ग्रेड १ ची मानली जाते आपल्याकडे एवढा उत्तम कन्टेन्ट, कथा आहे तर हा कामातील व्यावसायिक पणा जपला पाहिजे. चोख काम करून व्यावसायिकता जपली पाहिजे. अनेकदा आपल्याकडे कामाच्या बाबतीत एकमेकांना विचारलं नाही जात. कोण कोणत्या प्रोजेक्ट्स साठी कोणत्याही तऱ्हेनं काम करतात. आपण कन्टेन्ट च्या बाबतीत श्रीमंत आहोत तर व्यावसायिकता सुद्धा तेवढीच हवी.
“संगीता सोबत अतूट नातं” / “घरात संगीतमय वारसा”
माझी आत्ये बहीण, आत्या या दोघी गातात. माझे बाबा सितार वादक आहेत. आजोबा स्वतः व्हॉयलीन वादक होते ते आता हयात नाहीत. मी गाण्याच्या रियाजाला माझ्या आजोबांच्या समोर बसायचो, गुरु शिष्य परंपरा असं होत. आजोबा गायचे नाहीत पण त्यांना गाण्याची पारख होती ते मला नेहमी प्रेरित करायचे. मी त्यांच्याकडून शिकलो. शाळेत असताना मी घरी येऊन रियाज करायचो. मी फक्त गात नाही तर मी तबला, हार्मोनियम, पियानो, सिंथेसायजर देखील वाजवतो. घरात हा गाण्याचा आणि वाद्य कलांचा संगम असल्यामुळे मला गायला आवडतं. संगीत हि एक अशी भावना आहे जी माणसाला जवळ आणू शकते आणि जोडून ठेवते. प्रत्येक माणसात कुठेतरी संगीत असायला हवंच.
“फिटनेसच् व्यसन”
रोज सकाळी तुम्ही उठता तेव्हा आरश्या समोर उभं राहून ते आरश्यासमोरील व्यती बघून आपल्याला फ्रेश वाटायला हवं. फिट राहायलाच हवं. स्वतःवर प्रेम करणं फार महत्वाचं आहे असं मला वाटत. जेंव्हा आपण फिट राहतो तेव्हा आपण फार सुंदर दिसतो. इंडस्ट्रीत एक व्यक्ती आहे जी आज सुद्धा तेवढीच फिट आणि हॅण्डसम दिसते ते म्हणजे अनिल कपूर. ते अजून सुद्धा तितकेच तरुण आहेत त्यांचं स्वतःवर प्रेम आहे. स्वतःची काळजी घेणं मग ती शारीरिक असो मानसिक असो, या बाबतीत फिट राहणं गरजेचं आहे. आपण कोणाही सोबत नातं जोडलं तरी जगात सगळ्यात छान नातं आपलं आपल्या सोबतच असतं. मला फिटनेसच महत्व आहे कारण मी फक्त या इंडस्ट्रीत आहे म्हणून नाही तर मी एक खेळाडू आहे तर म्हणून हि एक फिट राहण्याची सवय आहे. मला धावायला आवडतं. मी सध्या जिम ला जातो. कार्डिओला मी मैदानात जातो तिथे वर्क आऊट करतो. जेंव्हा वजनाचा व्यायाम असतो तेव्हा मी कामावरून येऊन रात्री जिम ला जातो. मी फिटनेस च्या बाबतीत कधीच हलगर्जीपणा करत नाही आणि करू ही शकत नाही. फिटनेस साठी लोक कंटाळा करतात. आपण स्वतःपुरता अर्धा तास तरी काढायला हवा. दिवसभरात आपण अनेक वेळ फोन वर असतो तर यातून वेळ काढून आपण फिट राहण्यासाठी पाऊल उचललं पाहिजे. मराठीत अगदीच कमी सहकलाकार फिटनेस बाबतीत वेळ काढतात . स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन स्वतःच्या बुद्धीची देखील काळजी घटली जाते. वर्क आऊट केलं कि मनाला मिळणार समाधान काही वेगळंच असतं जर मी काही नाही केलं तर मला बैचैन व्हायला होतं. चांगल्या गोष्टी खाणं आणि नियमित वर्क आऊट करणं या बाबतीत मी शिस्तबद्ध आहे.
“खटकणारी गोष्ट हीच, व्यावसायिकता जपा”
इंडस्ट्रीत खटकणारी गोष्ट हीच कि आपल्याकडे कोणताही प्रोजेक्ट्स करताना पहिलं वाक्य हेच असत कि बजेट नाही आहे. बजेट च्या बाबतीत मला आजवर अपेक्षित केलेलं काहीही मिळालं नाही. कुठे ना कुठे तडजोड हि करावी लागते. आपल्याकडे बजेट नसल्यामुळे सुरुवात इथून केली जाते. जर बजेट नसेल तर शो का करावा? आणि एवढचं असेल तर बजेट वाढवून काम करावं तर हा बदल आपल्या मराठी इंडस्ट्रीत झाला पाहिजे. सुरुवात बजेट नाही आहे इथपासून करू नये तर हे कुठेतरी बदल करून घडलं पाहिजे. उद्या मी निर्माता झालो तर बजेट च्या बाबतीत मी समोरच्याला कल्पना देऊन कामाबद्दल सांगून विषय बोलून गोष्टी पुढे घेऊन जाईन. कलाकाराच्या कामाच्या वेळा या फिक्स असायला हव्यात हे झालं तर कुठेतरी बाकी कलाकार त्यांच्या वेळेत येऊन काम करतील हि एक वेळेची शिस्त आपल्याकडे रुळली पाहिजे. कामात व्यावसायिकता यायला हवी. गृहीत धरलं नाही गेलं पाहिजे.
“मल्टिकरिअर घडवलं असतं”
अभिनेता नसतो तर मल्टिकरिअर घडवलं असतं. मी पटकन एखाद्या ठिकाणी सेटल होणाऱ्या मधला नव्हतो. मी C.A झालो असतो, खेळाडू झालो असतो. मध्यंतरी मीएनडीए ची तयारी ही करत होतो. आर्मीत जाऊ या या साठी फार तयारी करत होतो पण या बाबतीत आई थोडी हळवी झाली म्हणून तेव्हा मी त्या परिस्थितीत नाही गेलो. मी एमबीए ची परीक्षा दिली. ४ पैकी ३ पेपरात मी पास झालो. मला मध्ये सामाजिक कार्यकर्ता व्हायची हवा डोक्यात होती. मला तेव्हा लोकांनी कॉलेज मधल्या राजकारणात खेचण्याचा प्रयत्न केला पण मी जर तिकडे गेलो असतो तर मला नाटकासाठी किंवा बाकी मुलांसाठी काही करता आलं नसतं. मग मी अभिनेता झालो पण मी अभिनया सोबत क्रिएटिव्ह क्षेत्रात काम केलंय. नुकतंच मी २ कथा लिहिल्या आहेत ते २ प्रोजेक्ट्स लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतील.
“सोर्टेड आयुष्य आणि बरचं काही”
खऱ्या आयुष्यात मी फार सरळ मार्गी वागणारा, खूप स्पष्ट बोलणारा आहे. मी खऱ्या आयुष्यात फार फ्लो मध्ये असतो म्हणजे मला राग येतो, माझी चिडचिड होते, मी शांत असतो, मला रडू येतं, मला हसू येतं. अश्या अनेक भावनांसोबत मी जगत असतो. मला कुठलीच भावना थांबवायला आवडत नाही. जेंव्हा आपण खुश असतो तेव्हा लोकं सांगतात तेव्हा लोक सांगतात कि हसत रहा, पण जेंव्हा राग येतो तेव्हा लोकं का सांगतात शांत रहा?? तर हि सुद्धा एक भावना आहे नं! प्रत्येक भावना मुक्त छंदात जगता आली पाहिजे. माणसाने राग कधीच थांबवू नये कारण हि एक साधी भावना आहे जिथे आपण आपलं मन मोकळं करून टाकतो जे मनात आहे ते बोलून टाकतो. एकदा आपला राग बाहेर पडला कि आपण मनातून निर्मळ होतो. प्रत्येक माणसाने त्याचा भावना थांबवू नयेत असं मला वाटतं . कामाच्या बाबतीत मी फार प्रामाणिक आहे. मला वेळेच्या आधी कामावर जायला आवडतं. मग लोक कधीतरी याचा वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करतात आपल्याला त्यांच्या नजरेतून पारखत असतात. मी माझं काम चोख पार पाडतो. आपल्या आयुष्यात आपली अशी एक जागा असते तिथे प्रत्येकाने जगावं आणि इतरांना जगू द्यावं. माझा फार साधा सोप्पा फंडा आहे, दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय हे सुधारणं फार महत्वाचं आहे. मी खूप जास्त लोकांना मदत करतो मला ते आवडतं. लोकांचा त्रास बघणं नाही आवडत. मला एकत्र राहणं फार आवडत. कधी कधी एकटं राहणं हे फार त्रासदायी असत हे मी अनुभवलंय त्यामुळे मी आता फार मानसिकरीत्या मजबूत झालो आहे. मी आयुष्यात फार सोर्टेड आहे. मला माझं कौतुक आहे कि मी फार मजबूत झालो आहे याचा अभिमान आहे . सेटवर सुद्धा मी टीम मध्ये असतो. सेटवर काही भांडणं झाली तरी मला ते आवडत नाही. मी तसा शांत आहे. सगळ्यांसोबत बोलायला थोडा वेळ जातो.
“भावनांची गोष्ट”
भावना [इमोशन्स] हाच माझा प्लस आणि वीक पॉईंट आहे. मी कोणाच्याही बाबतीत पटकन हळवा होतो मग ती मैत्री असो किंवा कोणत्याही व्यक्तीला मदत करणं असू देत मी हळवा होतो. हि माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. माझ्यात माणुसकी आहे. चेहऱ्यावर मुखवटा घालून आत एक भाव आणि बाहेर एक भाव असं वागणं मला नाही जमत. जे आहे ते तोंडावर आहे. भावना हा माझा वीक पॉईंट आहे कारण तुमच्या स्वभावाचा कोणीतरी गैरफायदा घेत. मग मला थोडं हुशारीने वागावं लागतं. मी हि हुशारी कामाच्या बाबतीत दाखवतो. मी पटकन लोकांवर विश्वास ठेवतो. या जगातला प्रत्येक माणूस हा चांगला असतो पण परिस्तिथी त्याला वाईट बनवते.
“कलाकारांचं होणार वर्गीकरण चुकीचं आहे, कलाकार हा कलाकारचं असतो”
मला असं वाटत नाही कि मालिकांमधल्या कलाकारांना चित्रपटासाठी विचारलं जात नाही उलट हल्ली मालिकेतील कलाकार हे जास्त प्रसिद्ध असतात. मालिकेचे कलाकार, चित्रपटाचे कलाकार किंवा नाटकाचे कलाकार हे वर्गीकरण मुळात चुकीचं आहे. कलाकार हा नेहमीच कलाकार असतो. तो मालिकेत काम करतो, चित्रपटात किंवा नाटकात काम करतो हे जे वर्गीकरण कुठून आलंय हे मला माहित नाही. मी चित्रपटात, नाटकात, मालिकेत तिन्ही माध्यमात काम करताना काम करणारा कलाकार महत्वाचा असतो. जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहात. मला हे वर्गीकरण पटत नाही. कलाकार हा कलाकार असतो तो कुठेही काम करू शकतो.
“आणि अश्या वेळेस माणसांची खरी पारख होते”
काम असताना आपण जगाचे हिरो असतो. मग जो माणूस आपल्याला ओळखतो अश्या वेळी त्या व्यक्तीला उत्तर देणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि जो माणूस आपल्याला ओळखत नाही तर अश्या लोकांना उत्तर देण्याचा काही प्रश्नच उरत नाही. जेंव्हा आपल्याकडे काम असतं तेंव्हा सतत आपल्या बाजूला लोकांची होणारी गर्दी असते. आपल्याकडे एक ग्लॅमर असतं. नेहमीच आपण सगळीकडे प्रकाश झोतात असतो. मग आपण कसे हि असो तेंव्हा आपल्या बाजूला लोकांची चंगळ असतेच. जेंव्हा एखाद्या व्यक्ती कडे काम असतं तेव्हा सगळेच त्याच्या सोबत असतात. ती व्यक्ती सगळ्यांचं आकर्षण असते मग हे होतंच. यात महत्वाची गोष्ट अशी आहे कि जेव्हा आपल्याकडे काम नसत तेंव्हा खरी पारख होते. लोकं आपलं निरीक्षण करतात. काम नसतं तेंव्हा साहजिकपणे लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा पटकन बदलतो. अश्या वेळी आपल्याला समजून घेऊन आपल्याला प्रेरीत करून आधार देणारी माणसं फार कमी असतात. जेंव्हा काम असतं तेव्हा कौतुक होतं पण काम नसताना लोकांच्या नजरा बदलतात. काम नसताना कोण तुम्हाला आधार देऊन जे आहे त्या कामाची पोचपावती देतं हि गोष्ट फार मोठी आहे. आपल्याला प्रेरित करणारी लोकं फार कमी आहेत.
“१८ वर्षांची जिवाभावाची मैत्री ”
जवळच्या व्यक्ती इंडस्ट्रीत मधल्या माझे २ मित्र. माझे १८ वर्षाचे सोबती अमित कान्हेरे आणि प्रतिक. हे दोघे सुद्धा माझ्यासाठी फार जवळचे आहेत. दोघे हिंदी इंडस्ट्रीत काम करतात. आम्ही कॉलेज पासून मित्र आहोत. आम्हाला तेंव्हा वाटलं नव्हतं कि आमची मैत्री कुठवर टिकेल, पण आम्ही योगायोगाने आज पर्यंत सोबत आहोत. त्या दोघांनी मी जसा आहे तसं मला स्वीकारलं. कधीच मला judge नाही केलंय. ते मला प्रत्येक क्षणी शिकवत असतात माझ्याकडून काही वाईट गोष्ट घडली मी कुठेही चुकलो तर मला माझी चूक योग्य वेळी दाखवून देतात. चांगल्या गोष्टीचं कौतुक करून वाईट गोष्टी केल्या तर त्या देखील समजावून सांगतात. जगण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही आहे जसं आहे तसं आयुष्य जगत रहा हे मला माझ्या बाबांनी सांगितलंय. स्वतःच्या मर्जीने जगण्यासाठी ते मला पाठींबा देतात. माझ्या प्रत्येक क्षणी माझ्या सोबत राहणारे माझे हे जीवाभावाचे मित्र आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडे हि माझ्या बहीणी सारखा आहे तर अभिनेत्री समिधा गुरु ही जवळची मैत्रीण आहे.
रॅपिड फायर हे कि ते
आवडती अभिनेत्री : श्रेया बुगडे, प्रिया मराठे, समिधा गुरू, तेजस्विनी पंडित : श्रेया बुगडे
आवडता अभिनेता :हर्षद अटकरी, भूषण प्रधान, स्वप्नील जोशी : हर्षद अटकरी
मालिका, नाटक की चित्रपट : नाटक
गाणं कि खाणं? : खाऊन गाणं
सर्वात जास्त कोणत्या सोशल मीडिया चा वापर करतोस? इंस्टाग्राम की फेसबूक? : इंस्टाग्राम
हो की नाही…
१ ) सेलिब्रिटी असल्याचा फायदा कधी घेतलाय का?
नाही! मी सेलेब्रिटी असल्याचा फायदा कधीच नाही घेतला. मी सेलिब्रिटी नसतो तरी मला सगळं मिळालं असतं.
२ ) कधी कोणत्या सहकलाकारासोबत prank केलाय का?
मी प्रत्येक वेळी अनेक सहकलाकारासोबत प्रॅन्क करतो आणि असं करायला आवडत कारण यामुळे सेटवर एक खेळीमेळीचं वातावरण असायला हवं. त्यामुळे असं काहीतरी करून थोडं मजेशीर वागता येतं.
३ ) कधी कोणाचा टूथ ब्रश वापरलाय का?
हो मी आईचा टूथब्रश वापरला होता. मी विसरून जातो गोष्टी कुठे असतात त्यामुळे हे झालंय.
४ ) क्रश कोणत्या को स्टार वर?
माझं सगळ्या को स्टार वर प्रेम आहे. प्रत्येक सहकलाकार हा क्रश आहे त्यामुळे आमच्या कामाची केमेस्ट्री खुलून दिसते.
५ ) कधी ड्रिंक करून कोणाला फोन केलाय का?
खरंतर नाही केला कोणाला फोन. कारण ड्रिंक केल्यानंतर होश मध्ये नसतो आणि मग फोन हरवून जातो. मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायला नाही आवडतं.
६ ) एखाद्याला फेक फोन केलायं का?
फेक फोन म्हणून प्रॅन्क केला होता. ते कस्टमर केयर च्या नंबर सारखा प्रॅन्क कॉल २ ते ३ दिवस चालला आणि नंतर हे फोन प्रकरण घरापर्यंत आलं.
७ ) सोशल मीडिया वर ट्रोल झाला आहेस का?
हो सोशल मीडिया वर ट्रोल झालो आहे. ट्रोल होणं चांगली गोष्ट आहे मला अश्या मजेशीर अफवा आवडतात. मी याकडे सकारात्मक नजरेने बघतो.
८ ) सेटवर कोणाची खिल्ली उडवली आहे का?
सेटवर बऱ्याचदा मी खिल्ली उडवली आहे. अंजलीच्या सेटवर सुरुची, रेशम, हर्षद तर नव्या मालिकेच्या सेटवर प्रिया मराठे. पण मी नेहमीच मर्यादेत राहून खिल्ली उडवली आहे.
You are really great!!!piyhush sir😘😘😘