अक्षय तृतीया …
दरवर्षी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून साजरी केली जाते. हा दिवस सर्वकामांसाठी शुभ मानला जातो. कारण या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फळ प्राप्त होते असा समज आहे. अक्षय तृतीया हा सण आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. आपल्या भारतात प्रत्येक सणाची अशी एक गोष्ट आहे. हा सण मोठ्या उत्साहात घरोघरी साजरा केला जातो. अक्षय तृतीयाच्या दिवशी काय काय गोष्टी कराव्यात याचा एक छोटा आढावा घेऊ या !!
नव्या गोष्टींची खरेदी : हा सण मुळात साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो तर या शुभ दिवशी अनेक जण नव्या गोष्टींची खरेदी करतात . गाडी, नवं घर, वस्त्र, दागिने यांची खरेदी या दिवशी मोठ्या उत्साहात केली जाते. मोठे आर्थिक व्यवहार सुद्धा याच दिवशी पार पाडले जातात.
या गोष्टी कराच : अक्षय तृतीयेला अनेक शुभ आणि चांगल्या गोष्टींचा श्री गणेशा केला जातो. या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी. सकाळी तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. ब्राह्मण भोजन घालावे. या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.
शेती संबधी काही महत्वाच्या प्रथा : सण कुठला हि असो त्या प्रत्येक सणाला एक वेगळं असं महत्व आहे. शेती संबधी काही अनोख्या प्रथा या सणाशी निगडित आहेत.
वृक्षारोपण – अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. मातीत आळी घालणे व पेरणी – या दिवशी कोणत्याही धान्याची पेरणी केली जाते ते पीक भरगोस येतं आणि त्याची भरभराट होते.
सणाला आंब्याचा गोडवा : सण कुठला हि असो आपल्याकडे एकदम संस्कृतीकरित्या साजरा केला जातो. प्रत्येक सणाला असा एक वेगळा आणि अनोखा नैवैद्य दाखवला जातो. मे महिन्याचा मौसम असतो त्यामुळे आपल्याकडे अक्षय तृतीयेला खास रसाळ आंब्याचा आमरस आणि पुरणपोळी असा जेवणाचा थाट असतो.