अनेक गाजलेल्या शीर्षक गीतांची गीतकार, सूत्रसंचालक, लेखिका तसेच पत्रकार अशी बहुपैलू ओळख घेऊन जगणारी प्रसिद्ध गीतकार “अश्विनी शेंडे”
फक्त गीतकार एवढी ओळख न ठेवता “अक्षरा क्रियेशन” ची निर्मिती करणारी निर्माती ह्यांच्या बद्दल जाणून घेऊ या प्लॅनेट मराठी मॅगझिनच्या “स्टार ऑफ द वीक” मधुन….
संपूर्ण नाव : अश्विनी चंद्रशेखर शेंडे / अश्विनी जयदीप बगवाडकर
जन्मठिकाण : मुंबई
वाढदिवस : ३० ऑक्टोबर १९८३
लग्नाचा वाढदिवस : १८ डिसेंबर
शिक्षण : एमए (MA) मराठी, डिप्लोमा इन पत्रकारिता
“कॉलेज मधून गीत लेखनाची सुरुवात”
मी तेव्हा ठरवलं होतं की अभिनेत्री व्हायचं. कॉलेज च्या शेवटच्या वर्षी मी सगळं सोडून फक्त अभ्यास केला आणि कॉलेज मध्ये पहिली आले. कॉलेज पासूनचं नाटकाशी एक नाळ जोडली गेली होती मग तेव्हा कुठेतरी मनात प्रश्न उभा राहिला काय करू? आईची इच्छा होती प्राध्यापिका व्हावं, मग बाबांनी तेव्हा सांगतील तुझ्यात लिखाणाचा एक गुण आहे, मराठी विषय घेऊन बॅचलर केलं आहेस तर पत्रकारितेचा विचार कर. पत्रकारितेचा अभ्यास करता करता इंडियन एक्सप्रेस मध्ये काम मिळालं असं करून अनेक वर्षे पत्रकारिता केली. पत्रकारिता करताना अनेक ओळखी होत गेल्या, मी एका मॅगझीन साठी कॉलम लिहायचे, ते कॉलम वाचून मला अपर्णा पाडगावकरांनी “कळत नकळत” या मालिकेसाठी संवाद लिहिण्याची संधी दिली. संगीतकार निलेश मोहरीर सोबत माझा पहिला चित्रपट “आभास हा” प्रेक्षकांच्या समोर आला. मी आणि निलेश आम्ही एक टीम म्हणून आजवर अनेक कामं केली, अजूनही करतो आहोत तर खऱ्या अर्थी तिकडून गीतलेखनाची सुरुवात झाली.
“आयुष्यभर जगणारा लेखक”
तरूणाई पूर्वी पासून या क्षेत्राकडे वळत नव्हती. आपण हल्ली हे बघतो जर इंडस्ट्रीत १०० लोक जात असतील तर त्यातल्या काही लोकांना अभिनेता व्हायचं असतं, उरलेल्या लोकांना दिग्दर्शक व्हायचं असतं. यातून जी काही लोकं राहतात ते मेकअप आर्टिस्ट, लाईट्स, लेखक, कलादिग्दर्शन याकडे वळतात. “गीतलेखन” हे क्षेत्र पडद्यामागचं आहे. लोकांना ग्लॅमर च आकर्षण जास्त असतं पण मला असं नेहमी वाटतं की एका विशिष्ट काळा नंतर हे ग्लॅमर कुठेतरी कमी होतं. अभिनेता म्हणून वावर कमी होतो, तर अभिनय आणि बाकी क्षेत्रात एका काळा नंतर आपलं वय कुठेतरी आपल्या कामाच्या आड येतं पण लेखक हा आयुष्यभर लेखक म्हणून जगत असतो. आज एवढं वय होऊन ही गुलजार साहेब आहेत, जावेद सर आहेत ते इतकी वर्षे लिहितात. म्हणून मला वाटतं की हे एक असं क्षेत्र आहे जिथे तुमचं वय आडवं येत नाही. जेवढं वयाने मोठं होत जातो तेवढं लिखाणाच्या बाबतीत प्रगल्भ होत जातो ही लेखनाची खरी गंमत आहे. जर तरूणाई या क्षेत्रात येत असेल तर त्यांनी फार लक्ष केंद्रित करून लिखाण करावं. कॉलेज मध्ये कविता करणं आणि एक गाणं लिहिणं यात खूप फरक आहे. आजच्या घडीला “गुरू ठाकूर” हा असा कवी आहे की ज्याचं गाणं लाखो लोकांच्या प्ले लिस्ट मध्ये असतं संदीप खरे, वैभव जोशी जश्या कविता लिहितात अश्या ताकदीच्या कविता लिहिणं हे फार महत्त्वाच आहे आणि ते तेवढं सोप्प नक्कीचं नाही. आज माझं एखादं गाणं कोणाची रिंगटोन म्हणून वाजतं तेव्हा फार छान वाटतं. मन केंद्रित करून लिहिणं महत्त्वाच असतं. लेखन ही एक अशी कला आहे जी शिकवता येत नाही, यात सुद्धा एक साचेबद्धपणा आहे, पण तो ज्याला शिकवता येतो ज्यांच्यात लिखाणाची प्रतिभा असते. जी तरूणाई या क्षेत्रात येऊ पाहते त्यांना एवढचं सांगेन खूप कष्ट करावेच लागतात पण स्वतःला फार अपडेट ठेवावं लागतं. आपल्या आजूबाजूला लेखक काय लिहितात हे सतत बघावं की काय नवीन येतंय, नवीन गाणी ऐकावी, प्रत्येक लेखकाला आणि कवीला फॉलो करावं त्यांची काम बघावी. जर आपला कवी मित्र काही छान लिहीत असेल तर त्याला तेवढ्याचं आत्मियतेने कौतुक करायला पाहिजे. आजच्या काळात फक्त कागदावर लिखाण करण्यापेक्षा सतत नवीन गोष्टी ऐकल्या पाहिजे.
“फोटोग्राफी आणि कुकिंग आवडीची”
लिखाण सोडून मला फोटोग्राफी आणि स्वयंपाक करायला फार आवडतो. या दोन कला सुद्धा फार जवळच्या आहेत. याने मला प्रचंड आनंद मिळतो. माझं असं ठाम मत आहे की फोटोग्राफी आणि स्वयंपाक करायला कोणत्याचं महागड्या गोष्टींची गरज लागत नाही. आपल्याकडे फोटोग्राफी साठी एक विशिष्ट नजर असायला हवी. हळद , तिखट अश्या साध्या गोष्टींनी आपण उत्तम स्वयंपाक करू शकतो. जर मला कुठल्या सिरीयल चा भाग लिहून कंटाळा आला तर मी ब्रेक म्हणून किचन मध्ये जाऊन काहीतरी बनवते.
“उत्सुकतेने काम करता आलं पाहिजे, कलाकारांनी कधीच स्थिरावू नये”
एक गीतकार म्हणून माझा आज वरचा प्रवास आणि अनुभव खूप मस्त आहे या पुढे ही राहील. मला काम करताना नेहमी चांगली माणसं भेटत गेली, एका कामातून दुसरं काम मिळत गेलं. माझी मेहनत, कामाचा प्रामाणिक पणा हा कायम असल्याने काम चांगलंच करायचंय हे नेहमी डोक्यात असायचं. आजही नवीन शीर्षक गीत आलं तरी मी तसं काम करण्यासाठी तेवढीच उत्सुक असते. काम करताना अशी कुठेच भावना नसते की आता एवढं काम झालं तर बस्स झालं हे कधीच नाही वाटलं. प्रत्येक नवं काम करताना जर आपण तेवढेच उत्सुक आणि अधीर असू तर आपल्यात काम करण्याची एक जाण आहे हे सतत जाणवतं. ज्या दिवशी आपल्याला वाटेल आपण स्थिरावलो आहोत तेव्हा आपल्या कामांची प्रकिया थांबते. कलाकारांनी कधीच स्थिरावू नये असं मला वाटतं. सेट होणं ही काहीतरी थांबण्याची प्रकिया आहे. हे क्षेत्र खूप छान, आव्हानात्मक आहे इथली कामाची पथ्य पाळून मस्त काम करता येतं. आपल्याकडे लेखकापेक्षा कमी मानधन हे गीतकाराला मिळतं. आपल्या इंडस्ट्रीत अजूनही गाण्याचं मोल खऱ्या अर्थी अजूनही समजलेलं नाही. गाण्या बद्दल कौतुक, लिहिण्या बद्दल आस्था आणि गीतकारा बद्दल प्रेम असतं, पण हे प्रेम पैशात अजून उमटत नाही किंवा पैशाच्या बाबतीत हे कुठे दिसतं नाही. आजकाल मालिकांची शीर्षक गीत ही जाहिरातीमुळे कमी दाखवली जातात तर कामाला मिळणारी किंमत फार तुटपुंजी आहे त्यामुळे मला गीतकाराच्या सोबतीने लेखिका म्हणून काम करावं लागतंय. फक्त गीतकार म्हणून जगून आर्थिक गोष्टी सांभाळणं कठीण आहे, या क्षेत्रात येतांना लेखक म्हणून तुमचं क्षेत्र विस्तारता आलं पाहिजे. आपल्याकडे कुठला ही गीतकार हा फक्त गीतकार म्हणून न जगता तो जॉब करतो, लेखक म्हणून काम करतो म्हणून या क्षेत्रात येतांना गीतकाराच्या सोबतीने हातात वेगळं काही तरी काम हवं.
“कोणी क्रेडिट देतं का क्रेडिट” / आपले म्हणवणारे लोकं पैसे आणि क्रेडिट च्या बाबतीत हात मागे घेतात..
नुकतंच आम्ही सगळ्या लेखकांनी आणि गीतकरांनी एका गोष्टीवरून आरडाओरडा केला होता ते होतं की गीतकरांना त्यांच्या कामाचं श्रेय देणं. हिंदी असो किंवा मराठी. या सगळ्यात प्रत्येक क्षेत्राला मग ते कला दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट असो यांना श्रेय दिलं जातं पण यात गीतकरांना कुठेच श्रेय दिलं जात नाही. तुम्ही गाण्यां बद्दल बोलता, गायका बद्दल बोलता मग तुम्ही गीतकाराला यातून कसं वगळू शकता? गीतकार हा सुद्धा चित्रपटासाठी सगळ्यात मोठा भाग असतो यांची आपल्याकडे जाण नाही आहे. चित्रपट असो किंवा कोणताही प्रोजेक्ट असो तुम्ही जेवढं प्रत्येक क्षेत्राला श्रेय देता तेवढंच श्रेय गीतकाराला सुद्धा द्यावं एवढीच माफक अपेक्षा आणि मागणी आहे. जेव्हा एखादं चित्रपट समीक्षण असेल किंवा गाण्याच्या अल्बमचं समीक्षण असेल यात गीतकारांच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा नसतो या गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं. तर गीतकार म्हणून ही गोष्ट फार खटकायची आणि खटकते की गीतकाराला त्यांच्या कामाचं श्रेय हे योग्य रित्या दिलं गेलं पाहिजे. या संदर्भात वैभव जोशी ची पोस्ट होती की गाणं लिहिण्याच्या बदल्यात आम्हाला चांगलं मानधन आणि आमच्या कामाचं श्रेय हे मिळायला हवं ही एवढी माफक अपेक्षा गीतकरांनी करू नये का?? आपल्या इंडस्ट्रीत मानधन आणि कामाचं क्रेडिट या दोन गोष्टी फार खटकतात. ग्लॅमर आणि स्क्रीन च्या दृष्टीने गीतकार हा नेहमी पडद्या मागचा कलाकार आहे. “शब्दांचा कॅफे” हा आम्ही एक शो करतो तेव्हा मागे स्क्रीन वर गाण्याचे शब्द हे लोकांना दिसतात आणि लोक गाणी चालू असताना आमच्या सोबत गुणगुणतात तर लोकांचं हे प्रेम आहे. त्यांना शब्दांबद्दल प्रेम आणि जाण आहे. मी स्वतःला सुदैवी समजते की मराठी चित्रपट आणि मराठी भाषेसाठी काम करण्याची संधी मिळते. साहित्य हे आपल्याला लाभलेलं देणं आहे ते प्रत्येक कलेशी निगडित आहे. लोकांकडून नेहमीच लिखाणाचं कौतुक होतं तर ही एक कामाची पोचपवती असते पण मग हे आपले आपले म्हणवणारे लोकं पैसे आणि क्रेडिट च्या बाबतीत हात मागे घेतात ते वाईट वाटतं.
“एका कामातून दुसरं काम मिळतं गेलं”
पत्रकारिता करताना एकीकडे गाणं लिहिण्याचा प्रवास सुरु होता. कॉलेज मध्ये निलेश मोहरीर भेटला. पत्रकारिता सुरू होण्यापूर्वी आमचं काम सुरू झालं होतं. कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला असताना गाणी लिहून झाली फक्त ती रिलीज नव्हती झाली. कळत नकळत होऊन कुलवधू आलं तेव्हा कुठे यश प्राप्त होतंय अशी जाणीव झाली मग तेव्हा यांतच काम करावं हे पक्कं झालं जेव्हा मला कळत नकळत चे संवाद लिहिण्याची संधी आली तेव्हा समजलं की पत्रकारिता सारखा दगदगीचा जॉब करून हे संवाद लेखन नाही जमणार मग तेव्हा मी जॉब सोडला. मी आणि निलेश आम्ही दोघेही नवखे होतो या क्षेत्रात. त्यामुळे कामाच मस्त बॉंडिंग झालं, आम्ही भेटून गाणी लिहायचो, चाली लावून बघायचो यातून एकमेकांच्या कामाची देवाणघेवाण व्हायची. असं करून आम्ही छान काम चालू केलं होतं. मग अश्या रितीने एका कामातून दुसरं काम मिळत गेलं. आम्ही केदार शिंदेंसाठी काम केलं मग त्यांनी त्यांचा “यंदा कर्तव्य आहे” मध्ये आम्हाला काम दिलं. म्हणून चांगली काम आणि चांगली माणसं यातून प्रवास चालू राहिला.
“गोष्ट एका गाण्याची”
२०११ ला झी मराठी वर एक मालिका आली होती त्याचं नाव होतं “एकाच या जन्मी जणू” या मालिकेचं शीर्षक गीत फार गाजलं. गंमत अशी की २००८, २००९ आणि २०१० या तिन्ही वर्षी झी मराठीच्या गीतकाराचा पुरस्कार मला मिळाला तर तेव्हा मी फार तरुण गीतकार ठरले जिला तिन्ही वर्ष हा पुरस्कार मिळाला होता. मला माझं कोणतंच काम फारसं आवडत नाही कारण मी कामाच्या बाबतीत कधीच खुश नसायचे मला नेहमी कुठेतरी काही तरी कमी राहिलंय किंवा अरे अजून थोडा वेळ मिळाला असता तर छान झालं असतं असं नेहमी वाटत राहतं. “एकाच या जन्मी जणू” हे असं पहिलं गाणं होत की ते लिहून झाल्यावर मला खूप आनंद झाला तेव्हा कुठे मी समाधानी होते म्हणून हे गाणं फार खास आहे.
“सांभाळून घेणार कुटूंब”
पूर्वी कसा विचार केला जायचा माहीत नाही पण एका क्षेत्रातील जोडीदार नको असं मत असायचं. पण आता चित्र फार बदललं आहे. तर आता हे एका क्षेत्रातलं कोणी असेल तर जास्त समजूतदार पणा दाखवता येतो. आमच्या दोघांना ही जाणीव होते की आपल्याला दोघांना इंडस्ट्रीतलं कोणी माणूस जोडीदार म्हणून मिळाला असता तर त्याला आपलं क्षेत्र समजलं नसतं. आम्ही दोघे एकाच क्षेत्रात आहोत त्यामुळे एकमेकांना प्रॉब्लेम समजतात आणि मग समजून घेऊन आम्ही सोबत राहतो. जयदिपचं कधी कधी रात्री रेकॉर्डिंग ला जाणं किंवा मी घरी उशिरा येणं हे आमच्यासाठी रोजचं आहे आणि दोघांना इंडस्ट्रीत घडणाऱ्या समस्या माहीत आहेत तर मग अश्या समजुतीने आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो. मी घरी उशिरा येणार असेन तर तो आमच्या मुलीला सांभाळतो, जेव्हा त्यांचा शो असतो तेव्हा मी बऱ्याचदा त्याच्या कामासाठी तिथे असते तर हा समजून घेण्याचा स्वभाव एका इंडस्ट्रीत काम करताना येतो. माझ्या घरच्यांचा आणि खासकरून सासूबाईंचा मला पाठींबा असतो त्या सुद्धा मला माझ्या कामात मदत करतात आणि सगळं उत्तम रित्या सांभाळून घेतात. माझ्या आणि नवऱ्याच्या दृष्टीने आमच्यासाठी काम फार महत्त्वाच आहे, कामाच्या आड आम्ही एकमेकांची कोणतीच गोष्ट येऊ देत नाही. काम करताना घरच्यांचा पाठींबा फार महत्वपूर्ण ठरतो.
“एका स्वप्नांची गोष्ट / स्वप्नपूर्ती”
“अक्षरा क्रियेशन” हे आमचं स्वप्न आहे. परफॉमिंग आर्टस् साठी चालू केलेली ही एक संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत “शब्दांचा कॅफे” हा पहिला कार्यक्रम आम्ही सुरू केला. लाइव्ह शो दखिल करतो. जयदीप ने गेल्या ९ वर्षात त्याने जो लाइव्ह शो चा अनुभव घेतलाय सादरीकरणाच्या अनुभवाच्या जोरावर, तर त्याचे अनुभव आणि माझी लिहिण्याची एक अनोखी कला, गाण्याची कला आणि निवेदन कला यांचा संगम या शो मधून आम्ही करतो. लोकांना विविध गोष्टी ऐकायला आवडतात तर यातून रसिकांना काही तरी छान बघायला मिळेल म्हणून आम्ही कार्यक्रम करतो. फक्त गाण्या पुरतं मर्यादित नसून पुढे वर्कशॉप, संगीताचे धडे असतील, आर्टस् डिरेक्शन असे विविध पूर्ण कार्यक्रम यातून करायचे आहेत. आम्हाला असं वाटतं जेव्हा आमची मुलगी २० वर्षाची होईल तेव्हा तिला सांगता येईल की तुझ्या नावाने सुरू केलेली ही एक सुंदर संस्था आहे जी तू पुढे सांभाळ किंवा नवीन काही निवड पण हे तुझ्यासाठी अनोखं विश्व आहे. मुलांना आपल्या कामाच्या प्रकियेत सहभागी करून घ्यावं तर त्यांना त्याची किंमत समजते. जेव्हा अक्षरा मोठी होईल तेव्हा ती हे स्वप्न अजून मोठं करेल.
“बच्चन सरांसाठी काम करायचं”
मला अमिताभ बच्चन यांच्या साठी संवाद लिहायला आवडतील. आपण काहीतरी लिहिलेलं बच्चन सरांनी सादर करावं हे एक स्वप्न आहे.
“गुलजार ते शांता बाई”
माझ्यासाठी माझ्या कामाचं प्रेरणा स्थान गुलजार साहेब आहेत त्यांना मी गुरू मानते. मराठीत गदिमा आणि शांता शेळके हे दोघेही अफलातून लिहितात त्यांची लिहिण्याची पद्धत आणि शैली कमाल आहे. सौमित्र सुद्धा छान लिहितो तर अश्या प्रत्येकाकडून शिकायला मिळतं.
अश्या पाच गोष्टी ज्यांच्या शिवाय राहू शकत नाही..माझं कुटूंब, काम, चांगलं जेवण, संगीत ऐकणं आणि एसी.
रॅपिड फायर हे कि ते…..
पत्रकारिता, गीतकार : गीतकारिता
आवडता गीतकार : मंदार चोळकर, वैभव जोशी – वैभव जोशी
आवडतं सोशल मीडिया फेसबुक की इंन्स्टाग्राम : इंन्स्टाग्राम
कविता करणं की सूत्रसंचालन करणं : कविता करणं
लिखाण की फिरणं : लिखाण
आवडता गायक : जयदीप बगवाडकर, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर : जयदीप बगवाडकर
आवडती गायिका : बेला शेंडे की सावनी शेंडे : बेला शेंडे
आवडता दिग्दर्शक : स्वप्ना वाघमारे- जोशी की सतीश राजवाडे – दोघेही
बहुगुणी गीतकार तसेच लेखक “अश्विनी शेंडे” हिला प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!