आगरी- कोळी बांधवाना ‘नाखवा’ची साथ’ ‘बोंबील’ ॲप ठरणार मदतीचा हात..
ऑनलाईन जेवण मिळत हे तुम्ही ऐकल असेल, पण तशाच पद्धतीने ऑनलाइन मासे, आगरी-कोळी मसाला, चटकदार-चमचमीत कोळी पदार्थ, लज्जतदार रेसिपीज, अशा एक न अनेक गोष्टींची माहिती एकाचं ठिकाणी मिळाली तर? गणेश नाखवा या अस्सल मातीतल्या तरुणाने आपल्या समाजाच्या दृष्टीने आणि व्यवसाय वाढीकरता केलेल्या त्याच्या प्रयत्नांचं विविध स्तरांतून कौतुकं होतंय.
आपण कुठेही खूप जास्त गोंधळ घातला किंवा आवाज केला तर ‘काय मासळी बाजार आहे का?’ ही ओळ आपल्याला नेहमी ऐकायला मिळते. पण आगरी आणि कोळी बांधव कोणत्याही बाबतीत मागे पडू नये आणि या समाजाला योग्य तो आदर मिळावा या उद्देशाने गणेश नाखवा हा तरुण सर्वतोपरी प्रयत्न करतोय. मासेमारीचा व्यवसाय अधिकाधिक आधुनिक पद्धतीने करून हा नाखवा गेल्या काही वर्षांपासून त्याच्या शिक्षणाचा फायदा स्वतःच्या आणि इतर आगरी-कोळी बांधवांसाठी व्हावा म्हणून तो त्यांच्या हक्कांसाठी झटतोय.
स्कॉटलंड मधून बिझनेस स्टडीज मधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतला. मायदेशी परतल्यानंतरही त्याने एखाद्या बड्या कंपनीमध्ये नोकरी करण्याऐवजी आपल्या पारंपरिक मासेमारीच्या व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. लहान असल्यापासूनच मासेमारीची आवडं असणारा गणेशने, वयाच्या बाराव्या वर्षापासून मासेमारीला जाण्याची सुरुवात केली होती. लहानपणापासून या क्षेत्रात काम करत असल्यामुळे यातील अनेक बारकावे त्याने तेव्हापासून टिपण्यास सुरुवात केली होती. आजच्या काळातही मासेमारी हा केवळ एक जोडधंदा म्हणून नव्हे, तर एक व्यवसाय (बिझनेस) म्हणून त्याच्याकडे आपणं पहिले पाहिजे या विचाराने गणेश या व्यवसायाकडे वळल्याचं आवर्जून सांगतो. वडिलोपार्जी मासेमारीचा व्यवसाय सांभाळत असताना त्यातील अनेक गोष्टींविषयी सखोल माहिती मिळवण्याची सुरुवात त्याने केली. मासेमारी करण्यापासून ते थेट माश्यांची विक्री होईल पर्यंत येणाऱ्या अडचणी, होणारा फायदा अशा एक न अनेक प्रश्नांवर त्यानें स्वतःच प्रश्न तोडगा काढण्यास सुरुवात केली. सध्या गणेश आगरी आणि कोळी समाजाच्या अनेक समस्यांवर काम करतोय, सरकार दरबारी त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत असतो.
साधारणतः २०१६-१७ पर्यंत सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी सुरळीत चालल्या होत्या. परंतु समुद्रातील वादळांच वाढतं प्रमाण, हवामानातील बदल यांमुळे मच्छीमार आगरी कोळी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अखेर अथक प्रयत्नांतून केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आपल्या समाजासाठी योग्य तो न्याय आणि हक्क मिळवण्यासाठी तो झटतो. ‘जर शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची नुकसान भरपाई मिळू शकते तर मच्छिमार बांधवांना का नाही’ हा त्याचा परखड प्रश्न. व्यवसाय वाढवण्यासाठी उण्या पद्धतीची विक्री हा पर्याय पुरेसा नसल्यामुळे अत्याधुनिक तंत्र आणि विचारांच्या जोरावर त्याने विविध उपायही शोधले आहेत. सध्या अनेक कोळी तरुण बांधव या व्यवसायाकडे पाठ फिरवत आहेत. पण गणेशच्या प्रयत्नांमुळे हा तरुण पुन्हा मासेमारीकडे वळेल असा गणेशला विश्वास आहे.
करोनाची सुरुवात झाल्यापासून देशभरात संचार बंदीचे आदेश जारी करण्यात आले. त्यानंतर जवळजवळ चाळीस दिवस मासेमारीही थांबवण्यात आली होती. येणाऱ्या अडचणी अनेक आहेत पण त्यावर मात करणं ही गरजेचं असल्याचं सांगतं, शासनाच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन न होता. मासे विक्रीसाठी घरोघरी कसे पोहोचतील यावर भर देण्यास गणेश आणि त्याच्या काही सहकाऱ्यानी सुरुवात केली आहे.
नाखवा म्हणतो… मला फक्त आवडं म्हणून किंवा पारंपरिक व्यवसाय आहे म्हणून मासेमारी कधीचं करायची नव्हती. या क्षेत्रात आधुनिकता आणून एक बदल घडवावा हा मी पूर्णवेळ मासेमारीकडे वळण्याचा मूळ उद्देश. मी स्विकारत असलेल्या व्यवसायात मला खूप मेहनत करावी लागणार असल्याची कल्पना मला होतीच. पण माझ्या दृष्टीने बदल घडून या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा माझा प्रयत्न आहे. हा बदल घडण्यास कदाचित वेळ लागेल,, पण हा बदल घडणं व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल एवढं मात्र नक्की.
‘बोंबील’ ॲप, एकदम खास..
खास आगरी आणि कोळी समाजाला प्रगत करण्यासाठी आणि ‘स्मार्ट बिझनेस’करता हा ॲप महत्त्वाचा ठरतो आहे. ग्राहक आणि विक्रेता यांच्यातील दरी कमी करून, व्यवसायातून अधिकाधिक नफा मिळावा म्हणून हे आधुनिक पाऊल उचलल्याच तो सांगतो. ‘बोंबील’ ॲपचा गणेश नाखवाही महत्त्वाचा भाग आहे. प्रणीत पाटील या तरुणाच्या हाकेला साथ देत गणेश या उपक्रमाचा महत्वाचा भाग बनला आहे. संपूर्णतः आगरी-कोळी व्यावसायिकांसाठी हा ॲप सुरु केला असल्याचं तो आवर्जून सांगतो. रोजगार आणि ग्राहकांमध्ये वाढ व्हावी म्हणून हा ॲप मोलाची कामगिरी बजावणार आहे. कोळी मसाले विक्रेते, मासे विक्रेते, कोळी पदार्थ बनवून विकणाऱ्या महिला अशा सगळ्यांसाठी या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचणं सोपं होणारं आहे. शिवाय, लज्जतदार आणि चटकदार-चमचमीत आगरी-कोळी पदार्थ घरपोच मिळण्याची सोयही या ॲपच्या माध्यमातून होणारं आहे.
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)