संजय मधुकर खंदारे आणि शिव शिक्षण संस्थेचा अनोखा उपक्रम,
‘इकोफ्रेंडली ध्वज’ ठरतोय चर्चेचा विषय.
हिरवळीचा झेंडा
२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दोन्ही दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे दिवस. दरवर्षी देशभर हे दोन्ही दिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरे केले जातात. देशभर मानाने आणि दिमाखात तिरंगा फडकावून आणि हातात किंवा कपड्यावर मोठ्या आनंदाने सर्वजण राष्ट्रध्वज लाऊन देशाप्रतीचा आदर व्यक्त करतात, पण दुसऱ्या दिवशी किंवा अगदी त्याचं दिवशीही मात्र याच राष्ट्रध्वजाची दुरावस्था झाल्याचं आढळतं आणि राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. परंतु ‘हिरवळीचा झेंडा’ हा अवमान रोखतोय. कसं ते नक्की वाचा.
आपण सगळे भारतीय देशाचा स्वातंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. देशाचा आणि आपणा सगळ्यांचा अभिमान असणारा तिरंगा आपण या दोन्ही दिवशी दिमाखात मिरवतो. पण अनेकदा आपल्यापैकी अनेकांकडून अनावधानाने राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. देशाप्रतीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी मिरवला जाणारा तिरंगा या राष्ट्रीय सणांच्या दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर किंवा झाडांच्या बुंध्याला इतरत्र पडलेला दिसतो. राष्ट्रध्वजाचा हा अवमान रोखण्यासाठी काहीजण आपल्यापरीने प्रयत्न करतं आहे. सायनच्या डी. एस. हायस्कूल आणि शिव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन इकोफ्रेंडली तिरंग्याची शक्कल लढवली आहे.
डी. एस. शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या संजय खंदारे यांनी त्यांची ही कल्पना शाळेच्या इतर माजी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने सत्यात उतरवली. या अनोख्या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हे खास झेंडे बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. शिवाय, शाळेतील आठवी आणि नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी या इकोफ्रेंडली तिरंग्याचे महत्त्व खासगी, कॉर्पोरेट कंपन्या, गृहनिर्माण संस्था आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन समजावून सांगितले. विशेष म्हणजे या इकोफ्रेंडली तिरंग्याच्या संकल्पनेचे जागतिक पेटंट घेण्यात आलं असल्याची माहिती संजय यांनी दिली.
पर्यावरण पूरक असणारे हे झेंडे तिरंग्याचा अपमान रोखण्यास आपोआपचं मदतशीर ठरेल असं संजय खंदारे सांगतात. फळं-फुलं झाडांच्या बियांच्या रुपात दरवर्षी झाडं लावली जाऊन त्याचा उपयोग त्या कुटुंबाला होणारं असल्याचंही ते म्हणतात. त्यामुळे सगळ्यांनी हे पर्यावरणपूरक आणि राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या दृष्टीने घेतलेल्या पुढाकाराला पाठिंबा देण्याचं आवाहन ही मंडळी करतात. तुम्हालाही हा इकोफ्रेंडली तिरंगा खरेदी करायचा असल्यास किंवा या उपक्रमाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी ‘My Flag My Pride’ (माझा ध्वज माझा अभिमान) या फेसबुक पेजला किंवा www.myflags.in भेट देऊ शकता.
‘इकोफ्रेंडली तिरंगा’ म्हणजे काय?
कागदापासून बनवण्यात आलेल्या या तिरंग्याला पकडण्यासाठी लाकडी काठी किंवा प्लास्टिक स्ट्रॉ ऐवजी कागदी स्ट्रॉचा वापर करण्यात आला आहे. या स्ट्रॉमध्ये वांगी, भेंडी यांसारख्या फळभाज्यांच्या, तसचं गुलाब, सुर्यफुल, मोगरा यांसारख्या विविध फुलांच्या बिया आणि खतं टाकलं जातं. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर हा झेंडा माती असलेल्या कुंडीत रोवला जाऊ शकतो. कालांतराने या कागदाचे आणि कागदी स्ट्रॉचे विघटन होऊन, त्यातील बियांपासून नव्या रोपांची वाढ होते आणि यातूनच पर्यावरण राखण्यासही मदत होते.
अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)