अभिनेत्री निवेदिता सराफ ह्यांना आपण ह्याआधी ही प्रेमळ आईच्या भूमिकेत पाहिलं आहे पण त्यांनी का स्वीकारली असेल ही मालिका? जाणून घेऊया त्यांचं मत…
कलर्स मराठीवर ४ एप्रिलपासून “भाग्य दिले तू मला” ही विराट एंटरटेनमेंट निर्मित मालिका सुरू होत आहे सोम ते शनि, रात्री ९.३० वा. नुकतेच मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आले, प्रोमोला उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्याला नाविन्याची कास तर तिला संस्कृती जपण्याचा ध्यास, कसा होईल त्यांचा एकत्र प्रवास? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल… पण त्यांच्या हळुवार प्रेमाची गोड गोष्ट जाणून घेण्यासाठी नक्की बघा “भाग्य दिले तू मला”. प्रभावशाली संवादफेक आणि त्याला उत्कृष्ट अभिनयाची जोड असलेली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री निवेदिता सराफ रत्नमाला ही व्यक्तीरेखा साकारणार असून त्यांच्यासोबत विवेक सांगळे, तन्वी मुंडले, जान्हवी किल्लेकर प्रमुख भूमिकेत असणार आहेत.
आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनामध्ये अबाधित स्थान निर्माण केलेल्या, ज्यांच्यावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात अश्या आपल्या लाडक्या निवेदिता सराफ या मालिकेविषयी बोलताना म्हणाल्या, “तीन पात्रांभोवती फिरणार्या या कथानकात “रत्नमाला” या पात्राचे ठाम असे स्वत:चे मत, विचार आहेत. खूपचं वेगळी भूमिका आहे आणि म्हणूनचं मी मालिका करण्याचा निर्णय घेतला. रत्नमालाने स्व:बळावर स्वत:चे विश्व निर्माण केले आहे. तिने इथवरची वाटचाल आपल्या परंपरा, संस्कृतीला घट्ट धरूनच केली आहे. परंतू याउलट राजवर्धन आहे. आणि इथेच दोन पिढींमधील विचारांमध्ये खटके उडत आहेत, एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहेच पण दोघेही आपल्यापल्या मतांवर ठाम आहेत. यासगळ्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो आणि म्हणूनच रत्नमालाला अशी मुलगी घरात सून म्हणून हवी आहे जी तिचंच प्रतिबिंब आहे. जिच्या मदतीने ती आपल्या मुलाला सुधारू शकेल. कारण, आज आपण प्रत्येक घरामध्ये हे होताना बघतो माझं यावर एकंच म्हणणं आहे जुन्या लोकांचा अनुभव घ्या आणि पुढे जा. पण आताच्या मुलांना हे पटत नाही. ही दोन पिढींमधील जी वैचारिक तफावत आहे ती या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. मालिकेचे कथानक प्रेक्षकांना नक्कीच आपलंस वाटेल.”
Source- गायत्री कोलते (कलर्स मराठी)