बाहेर असलेला कोरोनाचा कहर आणि सगळी परिस्थिती फार गंभीर असताना आपल्याला अगदी चोख पणे बातम्या देणारी अनेक मंडळी आपल्यासाठी फील्डवर राहून आपल्याला योग्य बातम्या देत आहेत.
प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट देणार्या अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि आपली मीडिया या साठी अहोरात्र काम करते आहे. प्रत्येक पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडिओ ग्राफर आणि मीडिया मधली प्रत्येक व्यक्ती या साठी कार्यरत आहे. कोणी फील्ड काम करतयं तर कोणी वर्क फ्रॉम होम! पण त्या सगळ्यांना आपल्या पर्यंत योग्य माहिती आणि खऱ्या बातम्या पोहचवायच्या आहेत. या साठी मीडिया मधली प्रत्येक व्यक्ती आपल्या जिवाची पर्वा न करता काम करते आहे. या सगळ्यांच्याच कामाला सलाम!
सकाळचं बुलेटिन असो किंवा फील्ड वर जाऊन बातमी करणं वा कुठली ब्रेकिंग न्युज असो ती लगेच लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांची धडपड सुरूचं असते. बातमी करताना आपल्या जीवाची बाजी लागते. डेडलाईन मिस होऊ नये याची काळजी घेऊन अगदी वेळेवर आपल्याला क्षणा क्षणा चे अपडेट देणारी हि पत्रकार मंडळी या सगळ्यात आपल्या जीवाची पर्वा न करता काम करतात.
रिपोर्टिंग करणं हे किती जोखमीचे आणि आव्हानात्मक काम झालंय. अशाच ऑन फिल्ड कामाचा अनुभव आपल्या सोबत शेयर करतायत इंडिया टुडे / आजतक चे डेप्युटी एडिटर “कमलेश सुतार” आणि एबीपी माझा ची पत्रकार “रश्मी पुराणिक”
“सदैव लक्षात राहणारं रिपोर्टिंग”
टीव्ही पत्रकार हे नेहमीच बातमी साठी फील्ड वर काम करतात त्यामुळे प्रत्येक बातमी ही नीट करायला लागते मग यात एखादा बॉम्ब स्फोट असू देत किंवा राजकीय रॅली असू देत किंवा मोर्चा, या प्रत्येक ठिकाणी टीव्ही रिपोर्टर, कॅमेरामन स्वतःहा काम करतात. कोरोनाच संक्रमण झालं आणि देशा सह महाराष्ट्रात लॉकडाऊन व्हायच्या आधी आपल्याकडे थिएटर, जिम, मॉल अशी ठिकाण बंद करण्यात आली. अश्या वेळी प्रत्येक पत्रकार हा ऑन फिल्ड काम करत होता. यात एक बाब अशी मुंबईतील एकाच कॅम्प मधले १६७ पैकी ५३ पत्रकार हे कोरोना पोस्टिव्ह निघाले, बाकी ठिकाणी सुद्धा अनेक पत्रकार यात पोस्टिव्ह आलेत तर हा सगळाच अनुभव प्रत्येक पत्रकारासाठी वेगळा होता, माझ्या सारख्या अनेक पत्रकारांनी २६/११ सारखा बॉम्ब ब्लास्ट ऑन फिल्ड राहून कव्हर केलायं पण विषाणूचा हल्ला कव्हर करणं हा अनुभव फारच वेगळा आणि भयानक अनुभव देणारा आहे. हा विषाणू नक्की काय आहे, त्याचं संक्रमण कसं होत हे सुरुवातीच्या काळात कल्पना नव्हती, त्यामुळे पत्रकारांना झालेलं हे संक्रमण जास्त प्रमाणात बघायला मिळतं. चॅनेलने पत्रकार आणि कॅमेरामन ला त्या त्या विभागात एकत्र राहून सोबत काम करायला लावल. जो नियमित फील्ड वर काम करतो त्याला घरून काम करणं शक्य नसतं, प्रिंट मीडिया मध्ये हे थोडाफार प्रमाणात शक्य होत पण टेलिव्हिजन मध्ये ग्राउंड रिपोर्टिंग करावं लागतं. नवीन नवीन स्टोरी करणं फार आव्हानात्मक होत, लोकांना अचूक गोष्टी दाखवण्यासाठी योग्य रिपोर्टिंग करणं, स्टोरी शोधणं हे सगळंच आव्हानात्मक होत.
धारावी सारख्या ठिकाणी रिपोर्टिंग करताना तिथल्या लोकांची मानसिकता लक्षात घेऊन काम करणं महत्वाच असतं. अगदी तारेवरची कसरत प्रत्येक पत्रकाराला करावी लागते. यात आपल्या सोबत आपल्या परिवाराची काळजी घेणं महत्त्वाच असतं, माझ्या ओळखीत अनेक पत्रकार आहेत ज्यांना घरातून बाहेर पडताना जीव मुठीत घेऊन काम करावं लागलंत. पत्रकार, फोटोग्राफर हे सगळेच जनतेच्या समोर जाऊन काम करतात तर हे एक प्रकारचं समाधान आहे की अश्या परिस्थितीत आपण काम करतोय एक गोष्ट सदैव लक्षात राहणार आहे एक पत्रकार म्हणून आपण लोकांपर्यन्त बातम्या पोहचवतो आहे हे एक आयुष्यात नेहमीच लक्षात राहणार आहे. काही गोष्टी बातम्या करताना आपण जीवाची पर्वा न करता घराबाहेर पडून बातमी करतो आणि कुठेतरी लोकांना योग्य ती बातमी देतो आहोत हे अनुभव समाधानकारक असतात त्याच्या पुढे आपली भीती नाहीशी होते, त्यामुळे कोरोनाचा अनुभव नेहमी लक्षात तर राहीलच पण आपण एक पत्रकार म्हणून लोकांसाठी काम करत होतो हे लक्षात राहील आणि खूप समाधान देणारं असेल.
(कमलेश सुतार – आजतक / इंडिया टुडे)
“आव्हानात्मक रिपोर्टिंग”
या आधी बॉम्बस्फोट, नैसर्गिक आपत्ती पूर, पाऊस ह्याच्या बातम्या केल्या आहेत तो आणि कोरोनाबाबत बातम्या करणे हा वेगळा अनुभव आहे. कारण आधीच्या घडामोडीत संकट, झालेले नुकसान डोळ्यासमोर होतं. कोरोनाचे संकट समोर दिसत नसल्यामुळे काम करणं कठीण असतं. नेमकं कोणत्या भागात प्रादुर्भाव झाला, कुठे रुग्ण आढळले, जे दगावले त्यांची माहिती हे सगळं कळल्यावर मग आमचं काम सुरू होत. रुग्णांची वाढती संख्या, मुंबईसारख्या शहरात लोक दाटीवाटीने राहतात तिथे कुठे धोका आहे हे फक्त समजून घेऊन बातम्या करतो. एखाद्या ठिकाणी रुग्ण आले की तिथे काय काय काळजी घेतली गेली हा फॉलो अप घेऊन काम करतोय.
लॉक डाऊन मुळे हे काम अजून जिकीरीचं झालंय. लोकांना सांगूनही ते गर्दी करत आहेत, त्यांना पत्रकार टाळू शकत नाही कारण आम्ही बातमी करत असतो आणि कोण रुग्ण आहे, कोणाला बाधा झाली हे माहीत नाही, दिसत नाही. पत्रकार माहिती घेण्यासाठी सतत सगळ्यांशी बोलत असतो. हा धोका पत्करून की ह्यातला कोणी एक कोरोना बाधित असेल तर पत्रकाराला पण संसर्ग होऊ शकतो. संपूर्ण शहर ठप्प आहे, जेवणाची, टॉयलेटची नीट सोय नाही. फिल्डवरून काम करून घरी आल्यावर मनात गिल्ट असते. आपल्यामुळे आपल्या घरच्यांना काही झालं तर? घरात लहान मुलं, आई वडील सगळे साठीच्या वर त्यांना काही हवं नको ते पाहावं लागत, आणि जवळ थांबू शकत नाही. दोन्ही पातळीवर कसरत आहे. पत्रकार आणि एक व्यक्ती म्हणून आपण कोरोनाचे कॅरीयर होणार नाही ना ही भीती मनात दररोज घरातून बाहेर पडताना येते.
(रश्मी पुराणिक – एबीपी माझा)
म्हणून आम्ही तमाम पत्रकारांच्या वतीने सगळ्यांना आव्हान करतो “घरीच थांबा, सुरक्षित रहा” आम्ही आपल्याला बित्तम बातम्या देण्यासाठी झटत आहोत, घरीच थांबून आम्हाला सहकार्य करा.
प्लॅनेट मराठी मॅगझीन कडून सगळ्या पत्रकार मंडळी ना मानाचा सलाम!
मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)