जग फिरण्याची हौस अनेकांना असते पण चक्क ३५ देश आणि ४ खंड पालथे घालून जगाला प्रदक्षिणा घालून येणं हे तेवढं आव्हानात्मक आणि धाडसाचं काम..
१९ मार्च २०१६ ते १९ मार्च २०१९ पर्यंतच्या प्रवासाची गोष्ट. या जगभ्रमंती साठी कोणतही नियोजन नसताना Crowd Funding च्या माध्यमातून हा प्रवास जिद्दीने पार करुन आपल्या मातृभूमीत येऊन सगळ्यांना अभिमान वाटावा असा ध्येयवेड्या “विष्णुदास चापके” यांच्या सोबत केलेली प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या निमित्ताने केलेली खास बातचीत..!!
“दिलीप धोंडे यांना प्रेरित होऊन केली जग भ्रमंती”
२०१० मध्ये कमांडर दिलीप धोंडे यांची मुलाखत करायची होती. त्यांनी एका छोट्या बोटीतून जगाला प्रदक्षिणा घातली होती आणि मग त्यांच्या त्या मुलखाती नंतर मला सुद्धा असचं मनात येऊन गेलं कि अापण सुद्धा असं काही तरी अनोख काम करू. साहसी आव्हानात्मक थ्रिल असलेलं. त्या वेळी वाटलेली गोष्ट आज सत्यात उतरली आहे. याचा होणारा आनंद अवर्णनीय असा आहे. खूप धाडस करून हा अनोखा प्रयत्न केला आणि आज तो सत्यात उतरला आहे याच समाधान मला आहे.
“अविस्मरणीय अनुभवाचा प्रवास”
३ वर्ष ३ दिवस हा फार मोठा प्रवास होता. फार अनुभव आणि अनोख्या तऱ्हेनं जगणं शिकवून गेला. उजाडणारा प्रत्येक दिवस काही तरी नव्या अडचणी, नवे अडथळे घेऊन समोर यायचा, मग रोज यांना समोर जाताना त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचो. रोज रात्री एखादा अडथळा येऊन समोर यायचा आणि सकाळी त्यावर मार्ग काढून प्रवासाची नवी वाट निर्माण करावी लागायची. या प्रवासात असंख्य गोष्टी शिकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या आणि आठवणीत राहतील असे अनुभव सोबतीला घेऊन हा प्रवास झाला.
“मायभूमीत परतल्याचा आनंद अनोखा”
जेंव्हा म्यानमार भारत मैत्री पूल हा ओलांडला तेंव्हा मायभूमीत परतल्याची जाणीव झाली आणि आनंद देखील झाला. मातृभूमीत पाऊल ठेवल्याचा तो क्षण काही औरच होता. इथे मला कोणत्याही पासपोर्ट ची गरज लागणार नव्हती. मी व्हिसा शिवाय मुक्तपणे हिंडू शकणार होतो. प्रवासाची सांगता आपल्या भारतात आल्यावर पूर्ण झाली म्हणून हा क्षण निश्चितच आनंदाचा आणि अविस्मरणीय असा होता.
“३ दिवसांच्या नियोजनावर जग हिंडलो”
मी प्रवास करताना अजिबात नियोजन नाही करायचो. नियोजन सोबतीला असायचं पण फक्त ३ दिवसाचं. पुढच्या ३ दिवसात कुठे जायचंय, काय करायचं, अश्या छोट्या छोट्या नियोजनातून माझा प्रवास घडत गेला. फार मोठे मोठे प्लॅन्स न करता छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊन हे नियोजन पार पडायचं. फार मोठे प्लॅन्स केले तर ते सत्यात कितपत उतरतील याबाबत काही शाश्वती नसायची. छोट्या प्लॅनिंग मध्ये पटकन तोडगा काढता यायचा. ३ दिवसाचं नियोजन करता करता ३ वर्ष ३ दिवस हा प्रवास पार पडला.
“माझ्यातल्या ‘मी’ पणाचा शोध”
हा प्रवास मला असंख्य अनुभव देऊन गेला सोबतीला मनाचं समाधान. मला स्वतःची अशी वेगळी ओळख या प्रवासाने करून दिली. मी कोण आहे, काय करू शकतो, माझ्यातली क्षमता काय आहे, मी काय नाही करू शकत. उदाहरण मी चिकन किंवा मटण पचवू नाही शकत. या माझ्या मर्यादा आहेत. मी एका दिवसात ७ किलो मीटर, २० किलो वजन घेऊन चालू शकतो. मी २ दिवस काहीही न खाता जगू शकतो. एक दिवस पाण्याशिवाय ही राहू शकतो. अश्या अगणित गोष्टीची उलगड या प्रवासादरम्यान झाली. माझ्यातल्या मी पणाचा शोध मला या प्रवासा मुळे घेता आला. माझी कार्यक्षमता आणि शक्ती याची जाणीव झाली. या प्रवासामुळे अजून स्वतःला चांगल्या पद्धतीने ओळखू शकलो.
“डिजिटली संपर्कात राहिलो”
जग भटकत असताना घरच्यांसोबत संपर्क ठेवणं हे सोशल मीडिया मुळे थोड्या फार प्रमाणात शक्य झालं. एक एक दिवस प्रवास हा पुढे जात होता तसा वेळेतही बदल घडत होता. मी ज्यावेळी साऊथ अमेरिकेत होतो तेव्हा तिकडची वेळ आणि आपली भारतीय वेळ ही एकदम उलट असायची. इकडे आई बाबा सकाळचा चहा घ्यायचे तेव्हा मी तिकडे रात्रीच जेवण करून झोपलेला असायचो. तर अश्या वेळी संपर्क साधणं थोडं अवघड होतं. मी त्यांच्यासाठी एक छोटा निरोप लिहून ठेवायचो आणि झोपी जायचो. मग ते सुद्धा दुसऱ्या दिवशी व्हाट्सअप वरून माझ्यासाठी एखादा संदेश रेकॉर्ड करून पाठवायचे. खूप दिवस आमचं समोरासमोर बोलणं नाही व्हायचं तिकडच्या आणि इकडच्या वेळांमुळे आमचा संपर्क हा डिजिटल स्वरूपात जास्त व्हायचा.
“पुस्तक लिहिणार”
मुळात मी नियोजना शिवाय जगणारा व्यक्ती आहे. छोट्या प्लॅन्स मधून काहीतरी नव्या गोष्टीचीं उलगड होत असते त्यामुळे मी काही फार पुढचे प्लॅन्स बनवले नाहीत. सध्या माझ्या डोक्यात पुस्तक लिहिण्याचा प्लॅन आहे. त्याच बरोबर पत्रकारिता आणि पर्यावरण क्षेत्रात काम करण्याची संधी मला प्राप्त झाल्यास मी तिकडे हि काम करेन.
प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे ध्येयवेड्या आणि कर्तृत्ववान “विष्णुदास चापके“ ह्यांना सलाम! आणि भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!
शब्दांकन : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)