नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करून बहुरुपी भूमिका साकारणारे “निलेश दिवेकर”आमच्या या आठवड्याचे स्टार ऑफ द वीक आहेत
नाटक, मालिका, जाहिरात आणि चित्रपट हा अनोखा प्रवास ते अजून सुद्धा तेवढ्याच सहजतेने पार पाडत आहेत.. अनेक छोट्या पण लक्षवेधी भूमिका चोख पणे करण्याची शैली निलेश यांच्या कडे आहे. आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिराणी, महेश मांजरेकर , अमोल गुप्ते, अभिजित पानसे, अश्या बड्या दिग्दर्शकांसोबत तसेच बिग बी अमिताभ बच्चन, अजय देवगण, संजय दत्त, सतीश शाह, स्मृती इराणी, शेखर सुमन, गोविंदा, सोनाली बेंद्रे ते आता बहुचर्चित ठाकरे सिनेमा निमित्ताने नवाझुद्दीन सिद्दीकी अश्या बॉलिवूड स्टार्स सोबत काम करण्याची संधी यांना मिळाली आणि त्यांनी संधीच सोन करून अनेक कमालीच्या भूमिका साकारल्या… “स्टार ऑफ द वीक” च्या निमित्ताने आम्ही त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला..
१. तुमच्या पार्श्वभूमी बद्दल काय सांगाल?
हा प्रवास अजून सुद्धा चालूच आहे. अभिनयाची पार्श्वभूमी सांगायची झाली तर दुसरीत असल्यापासून मी नाटक करायला सुरुवात केली. शाळेत असताना बालनाट्य करायला सुरुवात केली इथून अभिनयाची आवड निर्माण झाली. नाटक हा माझा आवडीचा विषय होता मग कॉलेज सुद्धा असंच शोधायचं होतं की जिथे ही नाट्य चळवळ सुरू राहील मग रुईया मध्ये ऍडमिशन घेतलं. रुईया नाट्यवलंय अनेक एकांकिका केल्या. नाटक आणि माझं नात रूढ झालं. अगदी कोणतीही भूमिका करायचो. मग इंटर कॉलेज साठी नाटक, एकांकिका केल्या. अश्यात आयनटी, उन्मेश, सवाई या स्पर्धा साठी एकांकिका करण्याची संधी मिळाली. “सती” एकांकिकेसाठी अनेक पारितोषिक मिळवली. तेव्हा एवढा आनंद व्हायचा की ते क्षण आज सुद्धा पटकन आठवतात. नाट्यदर्पण पटकावला तेव्हा मिळालेलं अवॉर्डस फिल्मफेयर सारखे वाटायचे. मग नाटकाच्या सोबतीने प्रवास सुरु झाला अश्यात राजन वाघदारे यांच्या कडून एका हिंदी मालिकेसाठी ऑडिशन साठी बोलवण्यात आलं. तेव्हा मी ८०० एपिसोड केले हिंदी मालिकेसाठी. जवळपास १००० एपिसोड एकंदरीत हिंदी मालिकांसाठी केले. मग रुईया नाक्यावर महेश मांजरेकर यांच्या सोबत भेट झाली आम्ही दोघांनी एकत्र काम केलं वास्तव मध्ये. या काळात अनेक काम मिळत गेली आणि यातून शिकून, काम करून आज इथवर पोहचलो आहे.
२. अभिनयातील पहिलं पदार्पण?
नाटक चालूच होत पण खऱ्या अर्थाने “अंधायुद्ध” हिंदी फिल्म केली तेव्हा अगदी छोटा रोल होता पण तेव्हा हिंदी फिल्म्स मध्ये काम करणं एवढं मोठं वाटायचं की त्याच अप्रूप होत ही पहिली फिल्म केली नाना पाटेकरांसोबत काम करायला मिळाल. मग वास्तव, फेरारी की सवारी, अश्या अनेक फिल्म्स करत गेलो.
३. मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करताना काय वेगळेपण जाणवतं? हिंदीत ना एक “स्टार पॉवर” आहे जी आपल्या मराठीत नाही आहे. मराठीत काम करण्याचा अनुभव नक्कीच छान आहे पण हिंदीत काम करताना सुद्धा अनेक अनुभव येतात. आपल्याकडे एखादा चित्रपट जेव्हा टेलिव्हिजन वर येतो तेव्हा आपल्याला त्याची कहाणी समजते आणि अस होत अरे हा चित्रपट किती भारी आहे, हा चालायला हवा होता वगैरे वगैरे.. हिंदीत एखादा तगडा कलाकार असेल तर तो चित्रपट हिट होतो आणि चालू राहतो. मराठी प्रेक्षक वर्ग सुजाण आहे ते प्रत्येक गोष्ट बारकाईने बघतात. मराठी चित्रपट हा खूप लोकांपर्यंत पोहचत नाही याचं दुःख वाटतं. आपल्याकडे होणार प्लॅंनिंग थोडं चुकतंय. मराठीच मार्केट छोट आहे. ग्रँड लेवल ला काम करणारे चित्रपट कमी आहेत. वेगळेणा हा प्रत्येक ठिकाणी असतोच. आपल्या मराठीत एखाद्या चित्रपटावर फार कमी लोक मेहनत घेऊन काम करतात तर हा वेगळेपणा नक्कीच जाणवतो.
४. यापूढे कुठली अशी खास भूमिका करायचं स्वप्न आहे?
मला जेम्स बॉण्ड करायला नक्की आवडेल. प्रत्येक भूमिका ही फार पटकन येते आणि आपल्याकडून ती घडून जाते. आपण विचार सुद्धा करू शकत नाही की कधी कधी ही भूमिका आपल्याला करायला मिळेल पण ती येते आणि आपल्याकडून घडून जाते. मला जेम्स बॉण्ड फार आवडतो त्यामुळे मला त्याची भूमिका साकारायला नक्की आवडेल.
५. अभिनयाच्या सोबतीने आवडणारी अशी एक खास गोष्ट? मला अनेक गोष्टी करायला आवडतात. क्रिकेट, बॅटमिंटन खेळायला फार आवडतात. पण खास गोष्ट अशी की मला स्कुबा डायविंग करायला आणि पाण्याखालचं ते अनोखं विश्व अनुभवायला आवडतं. जशी संधी मिळते तश्या मी तमाम गोष्टी करतो.
६. वास्तव मधला खरा संजु बाबा अर्थात संजय दत्त आणि संजु मधला संजु बाबाची भुमिका साकारणारा रणबीर कपूर या दोघांपैकी काम करताना जास्त कोण भावलं?
मुळात दोन लोकांची तुलना कधीच होऊ शकत नाही. प्रत्येकाचा स्वभाव अनोखा असतो. दृष्टी वेगळी असते त्यामुळे दोघही फार बेस्ट आहेत. संजय दत्त मित्र आहे त्यामुळे तो माणूस म्हणून देखील तेवढा उत्तम आहे. संजू ची भूमिका “रणबीर” पेक्षा कोणीच उत्तम करू शकल नसतं. संजूच्या भूमिकेला रणबीर ने खूप योग्य रित्या पार पाडलंय. तो एकदम परफेक्ट होता त्यामुळे या दोन्ही व्यक्ती मस्त आहेत. रील आणि रियल आयुष्यात हे दोघे हिरो आहेत.
७. आज वर तुमच्या चित्रपटसृष्टीतील करीअर बद्दल समाधान आहे का?
एक अभिनेता म्हणून अभिनेता कधीच समाधानी नसतो. त्याला दरवेळी नवं काही तरी करायचं असतं. अभिनेता हा शेवटचा श्वासापर्यंत अभिनेता म्हणून जगत असतो. नेहमीच कष्ट करून कामं केली की कामाचं समाधान मिळत. कॅडल मार्च या चित्रपटाच्या चित्रकारणीच्या वेळी शूट करताना तब्येत बिघडली तेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झालो पण थोडा आराम करून कामावर रुजू झालो आणि चित्रकरण संपवलं. चित्रपट रिलीज झाला त्यानंतर त्या चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला तेंव्हा कामाचं समाधान प्राप्त झालं. हा किस्सा आयुष्यभर लक्षात राहणारा आहे. असे अनुभव कामाला ऊर्जा देणारे असतात. पण कामाच्या बाबतीत कलाकारांने कधीच समाधानी होऊ नये त्याने नेहमीच नवीन काहीतरी करायला हवं.
८. एकूणच इंडस्ट्री मधील खुपणारी गोष्ट किंवा खंत?
इंडस्ट्रीत अनेक गोष्टीत चांगले वाईट अनुभव येत असतात. खंत या गोष्टीची आहे की अनेक गोष्टींची पूर्वयोजना नसते. कधी कधी आपल्या भावनिक गोष्टी यांच्या आड येतात. इथे प्रत्येकाने दिलेल्या शब्दाची जाण ठेवून काम करावं असच वाटतं.
९. हक्काचा जवळचा व्यक्ती?
खूप आहेत कोणाएकाचं नाव घेऊन चालणार नाही. आपल्याला घडवणारी अनेक लोकं असतात. माझा मित्रपरिवार एवढा मोठा आहे की प्रत्येक व्यक्ती ही जवळची आहे.
प्लॅनेट मराठी तर्फे निलेश दिवेकर यांना अनेक शुभेच्छा !!!