मराठी टेलिव्हिजन विश्वातील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा दिलखुलास अभिनेता.
आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला “जय ” असो किंवा बापमाणुस मधील “सूर्या” अश्या बहुपैलू या आठवड्याचा स्टार ऑफ द वीक
“सुयश टिळक” सोबत प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या निमित्ताने मारलेल्या काही खास गप्पा..!!
“आठवणी कॅमेऱ्यात टिपायला आवडतात”
फोटोग्राफी ची आवड खूप लहानपणा पासून आहे. त्याला कारणीभूत माझी आजी आहे. ती उत्तम फोटोग्राफर होती. हि आवड कधी आणि केंव्हा लागली हे कळलंच नाही. सुरूवातीला फार बेसिक कॅमेरा मध्ये फोटो काढायचो. मग ते पुढे अनेक स्पर्धांसाठी पाठवायला लागलो तेव्हा त्यासाठी बक्षीसं मिळायची. मग कुठेतरी पटकन लक्षात आलं कि आपल्याला हे जमतंय मग मी आवड जोपासण्यासाठी फोटोग्राफीचं शिक्षण घ्यायचं असं ठरवलं “शॅडोज फोटोग्राफी” इथून फोटोग्राफीचा अभ्यास केला. माझ्यासाठी फोटोग्राफी फार खास आहे जेव्हा मी स्वतः एकटा असतो. तेंव्हा मला काही गोष्टी ते क्षण जपून ठेवायला आवडतात. आणि कॅमेरात कैद करायला आवडतात. ती एक आठवण म्हणून आपल्या सोबत आयुष्यभर राहते. आठवणी या आपल्या आयुष्यात फार महत्वाच्या असतात. असंख्य गोष्टी नकळत आपल्या कॅमेरा मध्ये टिपल्या जातात. एखादा फोटो काढून तो क्षण आपल्याला जगता येतो आणि यातून मला आनंद मिळतो.
“स्विमिंगची आवड”
माझ्या अनेक गोष्टी लहानपणी पासून सुरु झाल्या आहेत. त्यातलं एक स्विमिंग. आई वडिलांमुळे याची आवड लागली. एक धम्माल म्हणून स्विमिंग करतो आता कुठेही पाणी दिसलं कि उडी मारून पोहल्या शिवाय शांत बसत नाही.
“सोशली जोडलो गेलो”
सोशल मीडिया वर व्यक्त होतो. माझ्या मते ते एक फार चांगलं माध्यम आहे. ते फार उत्तम रित्या तसेच सेन्सिबल पणे याचा वापर केला पाहिजे. सोशल मीडिया वरून अनेक चांगल्या गोष्टी करता येतात. काही अनोखा संदेश लोकांना देता येणार असेल किंवा काही गोष्टी लोकांपर्यंत पोहचवता येणार असतील तर ते सुद्धा आपण करायला हवं. या व्हर्चुअल जगात फक्त लाईक्स आणि कंमेट्स यातचं न रमता आपल्याला अनेक अनोख्या आणि कलात्मक पद्धतीने सोशल माध्यमाचा वापर करता येतो.
“बेस्ट कॉम्प्लिमेंट”
अनेक कॉम्प्लिमेंट्स येतात. मी सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्थाशी जोडलो गेलो. ज्यांच्या सोबतीने मला काही वेगळं काम करता येतंय. जे खूप विविध तऱ्हेने आज काम करत आहेत. अश्या अनेक एनजीओ शी जोडलो गेलो. जी काही अनोखी लोकं इथून जोडली गेली हीच माझ्यासाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे.
“इंडस्टीत एकत्र येऊन कामं करायला हवी”
इंडस्ट्रीत न आवडणारी गोष्ट हीच कि खूप गुप्तता पाळली जाते. प्रत्येक नव्या प्रोजेक्ट्स बाबतीत फार गुप्तता पाळली जाते. तर खरंच याची गरज आहे का? असं मला वाटत . हि सर्वात न आवडणारी गोष्ट आहे. इंडस्ट्रीत बदल घडायला हवा हे सांगायला मी फार नवखा आहे. एक गोष्ट नक्कीच होऊ शकते ती कि सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर ते जास्त मस्त काम होऊ शकतं. ग्रुप मध्ये होणारी कामं किंवा या सगळ्यात प्रत्येक ठिकाणी कामातली चढाओढ वाढते. जर एक फॅमिली म्हणून एकत्र येऊन प्रत्येक नव्या गोष्टीचा विचार केला तर ते काम त्याहून उत्तम रित्या पार पाडलं जाऊ शकतं. कल्पनांची देवाणघेवाण आणि बाकी गोष्टींवर चर्चा घडून जास्त चांगल्या प्रकारे एक “हेल्दी कॉम्पिटिशन” होऊ शकते. खूप उत्तम काम लोकांपर्यंत पोहचू शकत नाही मग यामुळे लोकांना काही अनोख्या कलाकृती पाहायला मिळत नाहीत.
“सहकार्याने पर्यावरणात बदल घडवू”
पर्यावरण आणि प्राणीप्रेम हे सगळ्यांना असतं पण त्या बद्दल काय कोणी काय करतंय का हे खूप महत्वाचं आहे. सहकार्य हा एकच मार्ग आहे, जिथून आपण काही तरी पर्यावरणाच्या आजच्या स्तिथीला तोंड देऊ शकतो. माणूस सुद्धा या सगळयाचा एक भाग आहे. हल्ली बदलणारं पर्यावरण आणि वातावरणात होणारे बदल याबद्दल लोकांनी जाणून घ्यायला हवंय. आतापण काही फार निरोगी वातावरणात जगत नाही आहोत. आणि जगात हा मुद्दा फार ऐरणीवर आहे याचा विचार प्रत्येक माणसाने केला पाहिजे. आपल्याकडे होणारा प्लास्टिकचा वापर किती आहे आणि आपण किती त्याचा वापर करतोय हे जाणून घेणं गरजेचं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा सारासार विचार करायला हवा. नव्या गोष्टीची निर्मिती होत असताना जुन्या गोष्टीची विल्हेवाट लावणं देखील तेवढं गरजेचं आहे. आपल्याला जगण्यासाठी लागणारं निरोगी वातारण निर्माण होत नाही. पुढच्या काही वर्षात हे चित्र फार भयानक होईल. सगळ्यांनी या गोष्टी चा विचार करून त्यावर तोडगा काढायला हवा.
“इंडस्ट्रीत सगळ्यांसोबत काम करायला आवडेल”
आता कुठे माझी सुरुवात आहे. अजून खूप काम करायचंय. पण “तुंबाड” पहिल्या नंतर मला राही बर्वे सोबत काम करायचंय. त्यांच्यासारखा जर दिग्दर्शक असेल तर काम करायला नक्कीच आवडेल.
“खऱ्या आयुष्यातला सुयश”
खऱ्या आयुष्यात सुयश फार निसर्गात रमणारा आहे. मला फार माणसं जवळ लागत नाहीत. मी एकटा जास्त असतो. मला शांतपणा आणि एकांतात राहायला जास्त आवडतं. निसर्गात रमायला आणि खूप पुस्तकं वाचायला आवडतात. काही वेळा मला पटकन राग येतो आणि मी त्यावर लगेच बोलून जातो, व्यक्त होतो. मला रिग्रेट ठेवायला आवडत नाही जे मनात आहे ते बोलून मोकळा होणारा मी आहे. मग यामुळे समोरच्याला वाईट वाटलं तरी काही वाटतं नाही कारण ते माझं फार स्पष्ट मत असतं. मी खूप स्पष्ट आणि पारदर्शक आहे. गोष्टी लपवायला मला आवडत नाहीत. मी फार शांत आणि आनंदी असतो.
“नवी मालिका : एक घर मंतरलेल”
मुळातं या मालिकेला भयपट म्हणता येणार नाही हि एक रहस्यमय कथा आहे. आणि हा सगळा एक थरार आहे. थ्रिलर रहस्य यातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. अश्या पद्धतीचा विषय मला या निमित्ताने करायला मिळतोय याचा जास्त आनंद आहे. मी आजवर अनेक प्रेमकथा, फॅमिलीच्या निगडित मालिका केल्या याला प्रेक्षकांनी फार प्रेम दिलंय काही वेगळ्या भुमिका करून पाहिल्या. या मालिकेतील “क्षितिज निंबाळकर” ची भूमिका माझ्या फार जवळची आहे. खूप हटके गोष्टी जमावणारा मुलगा आहे. गूढ स्वभावाच्या माणसाची भूमिका मी पार पाडतोय.त्याला गोष्टीच्या कथा आणि त्यामागची कहाणी जाणून घ्यायला आवडते. तो फार सरळ माणूस आहे. माझ्या फार जवळ जाणारी हि नवी भूमिका आहे. त्यामुळे मला ते करायला खूप मज्जा येतेय.
“ट्रोलर्स ना इंटरटेन करू नये”
प्रत्येकाची अशी एक वेगळी पद्धत असते. आपल्या फॅन्सना समजून घेण्याची, त्यांना रिस्पॉन्स देण्याची. मी लोकांना यावर अजिबात इंटरटेन करत नाही. माझं आयुष्य फार खाजगी आहे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणा सोबत आहे, काय करतोय, कुठे जातोय, कोण जवळचं आहे याच्याशी लोकांचं काही देणंघेणं नसावं. मी जे पडद्यावर करतो ते तुमच्या मनोरंजनासाठी तर त्यावर तुम्ही नक्कीचं आम्हाला कामाच्या बाबतीत कामाची पोचपावती द्या. पण हल्ली सोशल मीडिया मुळे असं झालंय कि आपण कोणाच्या हि वैयक्तिक आयुष्यावर बोलू शकतो असा एक लोकांचा गैरसमज झाला आहे. हा फार वाईट आणि त्रासदायक आहे. लोकांना व्यक्त होण्याची काही सीमा राहिलेली नाहीये. लोकं बोलताना कुठलाही विचार न करता, हव्या त्या भाषेत हवं ते बोलतात. प्रेमाबद्दल आदर आहे पण लोकं कोणाच्याही खाजगी जीवनाबद्दल हव्या त्या तऱ्हेने व्यक्त होतात. इथे काही तरी मर्यादा हव्यात. वाटेल ते सल्ले देतात. हवे ते अंदाज लावतात. याबद्दल मी फार पटकन बोलतो. मी लोकांच्या अश्या कंमेटस् डिलीट करून टाकतो. अश्या लोकांना आपण पुन्हा काही रिप्लाय दिला तर ते प्रकरण अजून कुठेतरी वाढतं. जशी आमची काही जवाबदारी आहे तशी लोकांची आमच्या बद्दल बोलताना त्यांनी भान ठेवण्याची गरज वाटते. माणूस म्हणून तुम्ही कोणाला दुखवत नाही आहात ना हा विचार व्यक्त होताना, ट्रोल करताना करायला हवा. मी सगळयांना विनंती करेन कि व्यक्त होताना एकदा समोरच्या माणसाचा विचार नक्कीच करा. आमच्या जीवनातील वैयक्तिक भावनांशी जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा आम्ही विरोध का करू नये!
“अभिनेता नसतो तर पडद्यामागची दुनिया अनुभवली असती”
अभिनेता नसतो तर मी नक्कीच फोटोग्राफर म्हणून या इंडस्ट्रीत आलो असतो. पडद्यामागे काम करायला मला आवडलं असतं. कॅमेराच्या मागे दिग्दर्शक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. अभिनेता नसतो तर नक्कीच हा प्रवास सुरु झाला असता. लोकांच्या प्रेमामुळे मी अभिनेता आहे. म्हणून जोवर अभिनेता आहे तोवर इथे काम करेन पण त्या नंतर मला पडद्यामागे राहून काम करायला जास्त आवडेल.
“वीक पॉईंट आणि प्लस पॉईंट ”
वीक पॉईंट हा आहे कि मी फार पटकन लोकांवर विश्वास ठेवतो आणि प्लस पॉईंट हा कि मी कोणाबद्दल कधीच मनात अढी ठेवून रहात नाही.
“भविष्यात बोल्ड विषयावर विचार करून काम करेन”
विषय कितपत चांगला आणि मजबूत आहे यावरून ठरवेन पण विनाकारण बोल्ड सीन करण्याची गरज नसेल तर नक्कीच त्याचा विचार करून निर्णय घेईन. हल्ली अनेक वेब सिरीज येतात त्यामध्ये फार बोल्डनेस हाताळला जातो. काही वेळा याची गरज नसताना हा एक ट्रेंड म्हणून करायचा तर हे व्यर्थ आहे. हे करताना मी १० वेळा विचार करेन. लोकांना आवडतंय म्हणून फक्त त्या मध्ये बोल्ड सीन करावेत कि, त्या विषयाची गरज आहे म्हणून ते करायचं या गोष्टीचा विचार करून मी ते काम करेन.
रॅपिड फायर! “हे” कि “ते”-
१ } मालिका, नाटक कि चित्रपट : नाटक
२ } फोटोग्राफी, अभिनय कि स्विमिंग : अभिनय
३ } मुंबई कि पुणे : मुंबई
४ } पुढचं पाऊल, दुर्वा कि बाप माणूस? :बाप माणूस
५ } आवडती अभिनेत्री हर्षदा खानविलकर, सई ताम्हनकर, तेजस्विनी पंडित, ऋता दुर्गुळे, सुरुची अडारकर : सई ताम्हनकर
६ } आवडता अभिनेता : सुबोध भावे, अंकुश चौधरी, आस्ताद काळे, सिद्धार्थ चांदेकर, सिद्धार्थ जाधव : अंकुश चौधरी